औरंगाबादः महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरिता नव्याने प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद महापालिकेला (Aurangabad Municipal corporation)दिल्या आहेत. त्यानुसार कच्च्या नकाशांचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात आले आहे. दरम्यान पालिकेतील मागील वॉर्डांच्या रचनेवरून (ward formation) अनेक आक्षेप नोंदवण्यात आले होते. विशिष्ट राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन ही रचना करण्यात आले होते. यासंबंधीची याचिका सुप्रीम कोर्टात सुरु आहे. मात्र आता राज्य शासनाने औरंगाबादमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नव्याने होणाऱ्या आखणीत प्रगणक गटानुसारच आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी दिले आहे.
महापालिकेची निवडणूक 2011 मधील जनगणनेच्या आधारेच होणार आहे. जनगणना करताना प्रत्येक वॉर्डात 1 हजार नागरिकांना एक समूह केला जातो. तो एका प्रगणकाकडे माहिती संकलनासाठी दिलेला असतो. त्यामुळे प्रत्येक प्रगणक गटाला विशिष्ट क्रमांक देण्यात येतो. त्यानुसार त्या प्रगणक गटाची ओळख असते. वॉर्डातील लोकसंख्या ठरवताना हे प्रगणत गट उपयोगात आणले जातात. त्यामुळे आता नव्याने रचना होताना हे गट न फोडता नकाशे तयार केले जातील, याची काळजी मनपा प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारुप आराखडा तयार करून ठेवणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी, अंतिम आराखडा तयार करतील. जरम्यान औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्डरचनेचा आणि आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ही याचिका निकाली निघाली तरच पुढील वाटचाल सोपी होणार आहे. त्यामुळे महापालिका आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहे. बुधवारी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी मनपा प्रशासक यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा करण्यात आली.
शिवसेना – 29
भाजप – 22
एमआयएम – 25
कॉंग्रेस – 10
राष्ट्रवादी – 03
बसप – 05
रिपब्लिकन पक्ष – 01
अपक्ष – 18
एकूण – 112
इतर बातम्या-
औरंगाबाद महापालिकेत आता तीन सदस्यीय प्रभाग रचना! तगड्या पक्षांचे फावणार, अपक्षांचा कस लागणार
‘भावी’ काळात ‘आजी-माजी’ एकत्र? औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत