मोठी बातमी | औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद, औरंगाबादेत पुरातत्त्व विभागाचा महत्त्वाचा निर्णय

| Updated on: May 19, 2022 | 10:40 AM

खुलताबाद परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आता अखेर पुरातत्व विभागाने ही कबर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ही कबर पहता येणार नाही, असे विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मोठी बातमी | औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद, औरंगाबादेत पुरातत्त्व विभागाचा महत्त्वाचा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद (Khultabad) येथील मुघल बादशहा औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय पुरात्त्व विभागाने (Department of Archeology) घेतला आहे. एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी 12 मे रोजी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे कबर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांनी तर दोन दिवसांपूर्वीच स्वतःहून कबर बंद करण्याचा आग्रह धरला होता. कबरीला काही अज्ञातांकडून धोका असल्याचं स्थानिकांचं म्हणणं होतं. मात्र त्याच वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. परिसरातील वातावरण शांत केलं. तेव्हापासून खुलताबाद परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आता अखेर पुरातत्व विभागाने ही कबर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ही कबर पहता येणार नाही, असे विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कबरीसमोर नतमस्तक झाल्याने संताप

एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यासमोर ते नतमस्तक झाले. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. शिवसेना, भाजप, मनसेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. क्रूर मुघल बादशहाने महाराष्ट्राचे एवढे नुकसान केल्यानंतरही त्याच्या कबरीसमोर कुणी नतमस्तक कसे होऊ शकते, असा सवाल करत ओवैसींच्या कृत्याचा निषेध केला गेला. यावरून भाजप आणि मनसेनं महाविकास आघाडीला घेरण्याचाही प्रयत्न केला. खुलताबादेतील ही कबर उखडून टाकण्याची मागणीही शिवसेनेकडे केली गेली. तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

हनुमान चालिसावर कारवाई, मग इथं का नाही?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनीही शिवसेना प्रमुखांना याबद्दल जाब विचारला. हनुमान चालिसा म्हणल्यानंतर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. पण औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसी आणि जलील यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नाही. खुर्चीसाठी तुम्ही हिंदुत्ववादी विचारसरणी सोडली आहे. पोलीसही सरकारसमोर लाचार आहेत, असा आरोप करण्यात आला. तर भाजप नेते नितेश राणे यांनीही अत्यंत तीव्र यावर प्रतिक्रिया दिली. ‘औरंगजेबाच्या कबरीसमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायांवर महाराष्ट्रात फिरता येईल, असं या कारट्या ओवैसीला माहिती आहे.. कारण राज्यात नामर्दांचं सरकार आहे… ‘ असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं होतं. राजकीय नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रियांनंतर खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ तणवाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.