Aurangabad | राज्यभरात वादंग माजवणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचा खर्च माहितीय? काश्मीर ते कन्याकुमारीच्या बादशाहाची शेवटची इच्छा काय होती?

| Updated on: May 19, 2022 | 5:22 PM

नसीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगजेबानं आपल्या वसीहतमध्ये सांगितलं होतं की, माझी मजार कच्ची ठेवावी. मातीची कच्ची कबर तयार करायची आणि त्यावर सब्जाचं झाड लावायचं.. कबरीवर घुमट वगैरे बनवायचं नाही.

Aurangabad | राज्यभरात वादंग माजवणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचा खर्च माहितीय? काश्मीर ते कन्याकुमारीच्या बादशाहाची शेवटची इच्छा काय होती?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः काश्मीरपासून (Kashmir) कन्याकुमारीपर्यंत अधीराज्य गाजवणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाच्या  (Aurangzeb) कबरीवरून महाराष्ट्रासह मोठं वादंग माजलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद (Khultabad) इथं या औरंगजेब बादशहाची कबर आहे. अवघ्या देशावर राज्य करणारा औरंगजेब आयुष्यभर फकिराप्रमाणं जीवन जगला. त्यामुळे मृत्यूनंतरही बादशहाची कबर अगदी साधेपणाने बांधलेली दिसून येते. विशेष म्हणजे त्या काळी ही कबर फक्त 14 रुपये 12 आण्यात बांधली होती. मी कमावलेल्या पैशांनीच माझी कबर बांधा, अशी त्याची शेवटची इच्छा होती. टोप्या शिवून त्या विकून तसेच कुराण शरीफच्या प्रत हाताने लिहून तो विकत असे. यातून कमावलेल्या पैशांतूनच जो अन्न-धान्य विकत घेऊन, ते शिजवून खात असे, अशी माहिती खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे खादीम निसार अहमद यांनी दिली. औरंगजेबाच्या आयुष्यातील अनेक वैशिष्ट्यांवर तसेच मृत्यू समयी घडलेल्या घटनांवर त्यांनी प्रकाश टाकला.

काय होती शेवटची इच्छा?

खुलताबादेत ख्वाजा सय्यद जहमुद्दीन चिश्ती या सुफी संतांची मजार आहे. औरंगजेबाच्या काळापासून 400 वर्षांपूर्वीची ही मजार होती. औरंगजेब इथं अनेकवेळा येत असे. खुलताबादेत येऊन येथे त्याला शांती मिळत होती. त्यामुळे मी देशात कुठेही मरण पावलो तरी मला खुलताबादध्ये दफन करावं, असं त्यानं सांगतिलं होतं.

कबर कच्चीच असावी..

नसीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगजेबानं आपल्या वसियतमध्ये सांगितलं होतं की, माझी मजार कच्ची ठेवावी. मातीची कच्ची कबर तयार करायची आणि त्यावर सब्जाचं झाड लावायचं.. कबरीवर घुमट वगैरे बनवायचं नाही. कबरीवर रंगीत किंवा मलमलची चादर चढवायची नाही, असंही त्यानं सांगितलं होतं. कबरीभोवतीची सध्या ही मार्बलची जाळी आहे, तीदेखील त्या काळी नव्हती. मात्र ब्रिटिशांच्या काळातील लॉर्ड कर्झनने खूप विनंती केल्यानंतर हैदराबाद येथील सातव्या निझामाने ती लाकडी जाळी काढून येथे संगमरवराची जाळी लावली.

हे सुद्धा वाचा

कबरीसाठी 14 रुपये 12 आणे खर्च…

कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हुकुमत गाजवणाऱ्या औरंगजेबानं आपली कबर फक्त 14 रुपये 12 आणे एवढ्याच खर्चात बनवायची असं सांगितलं होतं. एवढा मोठा राजा असूनही तो स्वतःच्या हातानं टोप्या शिवत होता. कुराण शरीफ हाताने लिहून ते विकत होते. त्यातून मिळालेल्या पैशांतून तो जेवण करत असे. मृत्यूनंतरही आपल्या कबरीसाठी 14 रुपये 12 आणेच खर्च करायचे, सरकारचा पैसा कबरीसाठी वापरायचा नाही, असं त्यानं निक्षून सांगितलं होतं.

91 वर्ष जगला औरंगजेब

औरंगजेबचा जन्म 1616 मध्ये गुजरात राज्यातील दाहोतमध्ये झाला होता. तर मृत्यू 1707 मध्ये अहमदनगरमध्ये झाला. अशा प्रकारे औरंगजेब 91 वर्ष जगला आणि 50 वर्षे राज्य केलं. अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर तिथं त्याचं तत्कालीन पद्धतीनं पोस्टमॉर्टेम झालं. त्यानंतर त्याचा मृतदेह खांद्यावरून खुलताबादमध्ये आणला गेला.

औरंगजेबाचं खरं नाव काय होतं?

औरंगजेबाचं नाव अबुल मुजफ्फर मोहियोद्दिन मोहम्मद असं होतं. मात्र तो राज तख्तावर बसला तेव्हा त्याला औरंगजेब बहाद्दूर आलमगीर असं नाव दिलं होतं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यानं राज्य केलं होतं. त्यामुळे आलमगीर ही पदवी दिली होती.

खुलताबादचा अर्थ काय?

खुलदेमकाह अर्थात खुलदाबाद.. म्हणजेच स्वर्ग, जन्नत असा अर्थ आहे. मोठे मोठ्या सुफी संतांच्या कबरी खुलताबादमध्ये आहे.  त्यामुळे याला खुलताबाद म्हटलं गेलं आहे, अशी माहितीदेखील नसीर अहमद यांनी सांगितली.