Aurangabad | औरंगजेबाच्या कबरीवर गुडघे टेकणाऱ्यांचं नावही नको.. MIM च्या आरोपांवर डॉ.कराडांनी बोलणंच टाळलं

| Updated on: May 23, 2022 | 2:19 PM

केवळ नौटंकी करण्यासाठी भाजप तर्फे हा मोर्चा काढण्यात येत आहे. या शक्ती प्रदर्शनामुळे शहराला पाणी मिळणार नाही, फक्त राजकारण केलं जाईलअसा आरोप खा. इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Aurangabad | औरंगजेबाच्या कबरीवर गुडघे टेकणाऱ्यांचं नावही नको.. MIM च्या आरोपांवर डॉ.कराडांनी बोलणंच टाळलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांबद्दल काहीही बोलण्याची इच्छा नाही. जलील यांना औरंगाबादेत कोण विचारतं? त्यांना शहरातले प्रश्न तरी माहिती आहेत का, असा सवाल करीत भाजप नेते डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केलेल्या आरोपांवर बोलणं टाळलं. शहरातील भीषण पाणी टंचाईनिमित्त आज भाजपतर्फे विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र भाजपचा (BJP) हा मोर्चा म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. भाजपनं शक्ती प्रदर्शनक करत मोर्चा काढण्याऐवजी शहरातील नवी पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असती तर ते समजू शकलो असतो. पण तसं न करता केवळ पैसे देऊन लोकांना बोलवत मोर्चा काढण्याचं नाटक सुरु आहे, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय.

30,000 लोकांचा विराट मोर्चा

औरंगाबादमध्ये पैठण गेटपासून आज विशाल जलआक्रोश मोर्चा निघणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या मोर्चाचं नेतृत्व करणार असून याकरिता भाजपनं जय्यत तयारी केली आहे. या मोर्चात सुमारे 30 हजार महिला व पुरुष सहभागी होतील, असा दावा भाजपने केला आहे. या मोर्चाच्या आयोजनाच्या तयारीचा आढावा आज डॉ. भागवत कराड यांनी घेतला. पैठणगेटपासून दुपारी चार वाजता हा मोर्चा निघेल आणि पालिका आयुक्तावर विसर्जन सभा होऊन मोर्चा समाप्त होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

‘हंडे देऊन मोर्चात लोकांना आणणार’

भाजपच्या वतीने या मोर्चात सहभागी होण्यासाठी लोकांना पैसे देऊन बोलावण्यात आलं असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर मोर्चात येण्यासाठी लोकांना नवे हंडेही देणार असल्याचं लोकांनी फोन करून सांगितल्याचा आरोप खा. जलील यांनी केला आहे. मात्र या प्रकारामुळे खरंच शहराला पाणी मिळणार असेल, आम्हीही सहभागी झालो असतो, असे वक्तव्य खा. जलील यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

पाणीप्रश्नाचं खापर शिवसेनेवर

शहरातील भीषण पाणीटंचाईसाठी भाजपने शिवसेनेला जबाबदार ठरवले आहे. 55 किलोमीटर अंतरावर सर्वात मोठं जायकवाडी धरण असल्यामुळे शहराला पाणी कमी पडण्याचं कारणच नाही. मात्र फक्त वितरण व्यवस्था नसल्यामुळे शहरावर ही वेळ आली आहे. नागरिकांना आठ ते दहा दिवसांआड एक तासाकरिता पाणी येते. त्यातही राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी घेतली जाते. ही स्थिती शिवसेनेने आणली असल्याचा आरोप भाजपने केला आहे.