Aurangabad | औरंगाबादेत हर्सूल कचरा डेपोला आग, पत्र्याचे शेड जळून खाक, कचरा प्रक्रिया करणाऱ्या दोन मशीन भस्मसात

| Updated on: Jun 20, 2022 | 10:56 AM

ही आग कशामुळे लागली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच आगीमुळे कचरा प्रक्रिया करणाऱ्या आणखी कोणत्या साहित्याचं नुकसान झालं आहे, याची पाहणी मनपा अधिकाऱ्यांकडून केली जाईल.

Aurangabad | औरंगाबादेत हर्सूल कचरा डेपोला आग, पत्र्याचे शेड जळून खाक, कचरा प्रक्रिया करणाऱ्या दोन मशीन भस्मसात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः शहरातील हर्सूल (Harsul) येथील कचरा डेपोला (Garbage Depot) सोमवारी सकाळी भीषण आग लागली. पहाटे साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.   डेपोतील एका पत्र्याच्या शेडमधील कचऱ्याला अचानक आग लागली. यामुळे धुराचे आणि आगीचे लोळ उठू लागले. गावातील नागरिकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. महापालिका (Aurangabad municipal Corporation) अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने अग्नीशमन बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. नागरिक आणि अग्नीशमन दलाच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं. या आगीत कचऱ्याचं शेड पूर्णपणे जळून खाक झालं.

शहरासाठी महत्वाचा कचरा डेपो

शहरापासून काही अंतरावर असलेल्या हर्सूल येथे कचरा प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. सध्या या ठिकाणी सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मनपातील तीन प्रभागांचा सुका कचरा या ठिकाणी आणला जातो. महापालिकेने जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. बाजूलाच सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं काम इको सत्व या खासगी संस्थेच्या माध्यमातून केले जाते. सोमवारी पहाटे येथील पत्र्याच्या शेडमधील कचऱ्याला आग लागली.

दोन तासांनी आगीवर नियंत्रण

हर्सूल येथील कचरा डेपोला सकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यामुळे धुराचे लोट उठू लागले. नागरिकांनी तत्काळ धावाधाव केल्यानंतर मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवळपास दोन तासांनी ही आग आटोक्यात आली. घनकचरा विभाग प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव, अग्निशमन दलाचे प्रमुख राजू सुरे यांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. या दोनच तासात आगीचे मोठ-मोठे लोळ आकाशात जात होते. काळ्या धुरामुळे परिसराचं वातावरण मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झालं. या आगीत एनजीओ संस्थेच्या दोन बेलिंग मशीन जळाल्या, असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.

आगीचं कारण स्पष्ट नाही

दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच आगीमुळे कचरा प्रक्रिया करणाऱ्या आणखी कोणत्या साहित्याचं नुकसान झालं आहे, याची पाहणी मनपा अधिकाऱ्यांकडून केली जाईल.