Aurangabad Weather : औरंगाबादेत पावसाचा जोर ओसरला, ऊन-सावलीचा खेळ, 6 सप्टेंबरनंतर दणक्यात बरसणार

| Updated on: Sep 02, 2021 | 12:32 PM

6 सप्टेंबरनंतर तीन-चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. औरंगाबाद शहरात एमजीएम जेएनईसी (MGM JNEC) भागात 26.2 मिमी तर गांधेली (Gandheli, Aurangabad) भागात 21.3 मिमी पावसाची नोंद

Aurangabad Weather : औरंगाबादेत पावसाचा जोर ओसरला, ऊन-सावलीचा खेळ, 6 सप्टेंबरनंतर दणक्यात बरसणार
संग्रहित छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: औरंगाबाद आणि मराठवाडा (Rain in Marathwada Region) भागात पावसाचा जोर ओसरला असून आज बहुतांश भागात सूर्याचे दर्शन घडले. तसेच काही भागात ऊन-सावलीचा खेळ रंगलेला दिसून येत आहे. आता 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी होणार असून आकाश स्वच्छ राहिल. मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. मात्र पुन्हा 6 सप्टेंबरनंतर तीन-चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात  मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद शहरात एमजीएम जेएनईसी (MGM JNEC) भागात 26.2 मिमी तर गांधेली (Gandheli, Aurangabad) भागात 21.3 मिमी पावसाची नोंद झाली. तर1 सप्टेंबर रोजी एमजीएम जेएनईसी भागात 6.1 मिमी तर गांधेली भागात 23.4 मिमी पावसाची नोंद झाली.

कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील महसूल मंडळांपैकी 7 मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत. कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटल्याने भोवतालच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांची व्यथा जाणून घेतली. तसेच गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी नागद, सायगव्हाण या भागातील पिकांचीही यावेळी पाहणी केली.

सप्टेंबर महिन्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस

जूनमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. यंदा मान्सून सरासरीच्या 101% एवढ्या प्रमाणात होईल, असा अंदाज जूनमध्ये मान्सूनच्या आगमनापूर्वी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता. बुधवारी मात्र खात्याने या अंदाजात सुधारणा केली. यंदाचा मान्सून सरासरीइतरकाच पडेल, असे म्हटले गेले. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा 24.1% पर्यंत पाऊस पडला.

जिल्ह्यात यंदा सरासरीइतकाच पाऊस

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 5% जास्त, मराठवाड्यात 20% जास्त तर विदर्भात 14% कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबादसह, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सरासरीइतका पाऊस पडला. तर परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. जून ते ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात 528.2 मिमी पावसाची नोंद झाली. जालन्यात 667.4 मिमी, बीडमध्ये 573.1मिमी, लातूरमध्ये 557.6 मिमी, उस्मानाबादमध्ये 494.7मिमी, नांदेडमध्ये 792.4 मिमी, परभणी 718.5मिमी , हिंगोलीत 711.1मिमी , तसेच एकूण औरंगाबाद विभागात 639.1 मिमी पावसाची नोंद झाली. (Aurangabad, Maharashtra, The metrological department has forecasted light rain in some region today)

इतर बातम्या:

Pune Weather | पुण्यावर आज ढगांचं अच्छादन कायम, दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता

Weather Update : पालघरला रेड ॲलर्ट, मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, IMD कडून नवा अंदाज जारी