#ShivJayanti | औरंगाबादेत आजपासून शिवजागर उत्सवाला सुरुवात, शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कधी?

| Updated on: Feb 15, 2022 | 11:41 AM

औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच शिवसेनेच्या वतीनेही तीन दिवसीय शिवजागर उत्सवाची सुरुवात झाली आहे.

#ShivJayanti | औरंगाबादेत आजपासून शिवजागर उत्सवाला सुरुवात, शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कधी?
शिवजयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने शिवचरित्राचे पारायण करण्यात आले.
Follow us on

औरंगाबादः आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत शिवसेनेच्या वतीने (Aurangabad Shiv Sena) आजापासून शिवजागर उत्सवाला प्रारंभ होत आहे. शिवजयंतीसाठी शिवसैनिक अनेक दिवसांपासून तयारी करत आहेत. आज 15 फेब्रुवारीपासून शिवसेनेच्या वतीने शिवजागर उत्सवाची सुरुवात क्रांती चौकातून केली जात आहे. आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत शिवजागर उत्सवाची रुपरेषा सांगितली. मात्र अवघ्या औरंगाबादकरांचे लक्ष लागलेल्या क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कधी करणार, याचे सस्पेन्स कायम ठेवले. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल, मात्र याची तारीख काय असेल, हे अजूनही जाहीर करण्यात आले नाही. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनेही शिवजयंती उत्सवाला रविवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते शिवचरित्र पारायण सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. ग्रंथदिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचे वाचन केले.

आजपासून शहरात शिवजागर

शहरातील क्रांती चौकात मंगळवारी शिवसेनेच्या वतीने ध्वजारोहण केले जाईल. त्यानंतर 36 शिवमशाली एका रथातून तिथपर्यंत जातील. मशाल यात्रेचे नेतृत्व शहरातील सर्व उपशहरप्रमुख करतील. तसेच दररोज सकाळी 10 आणि सायंकाळी 4 वाजता वाद्यवृंद मानवंदना देतील. महाअभिषेक व छत्रपती शिवरायांची आरती होईल.
– 15 फेब्रुवारी दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत
शिवचरित्रावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाईल. रात्री पावणे नऊ वाजता भव्य आतषबाजी केली जाईल.
-16 फेब्रुवारी रोजीदेखील शहरातील विविध भागातून शिवमशाली निघतील. संध्याकाळी साडे सात वाजता शाहीर गणेश गलांचे यांची शाहिरी आयोजित करण्यात आली आहे. रात्री पुन्हा आतिषबाजी केली जाईल.
-17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी प्रदीपदादा सोळुंके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

शिवसेनेचा पायंडा बदलणार?

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी तिथीने शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला होता. मात्र अनेक संघटना तारखेनी शिवजयंती साजरी करतात. त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये अनेक गट पडले आहेत. मात्र यापुढे एक राजा एक जयंती या तत्त्वानुसार, 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण विश्वात शिवजयंती साजरी करावी, शिवसेनेने हट्ट सोडावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा आरक्षण याचिकाकर्ते तथा औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष विनोद पाटी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्यानंतर औरंगाबाद शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि आमदार अंबादास दानवे यांनीदेखील शिवजयंती एकाच दिवशी साजरी करण्याच्या मागणीला दुजोरा दिला. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर याविषयी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आता शिवसैनिकांच्या मागणीनंतर शिवसेना आपला पायंडा बदलेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्सवाला प्रारंभ

दरम्यान, 13 फेब्रुवारी रोजी रविवारी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते शहरातील शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ग्रंथ दिंडी काढून शिवचरित्र पारायण शिवजयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली. ग्रंथदींडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सोहळा समितीतर्फे शिवचरित्र देण्यात आले. विद्यार्थ्यांनी याचे केवळ पारायण न करता प्रबोधनात्मक नाटिका सादर केल्या. या सोहळ्यासाठी आमदार अतुल सावे, नंदकुमार घोडेले, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे, अप्पासाहेब कुढेकर आदींची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

Vastu | वेळीच सावध व्हा नाहीतर होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान!, वास्तुच्या या 5 नियमांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Gangubai Kathiawadi : बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गंगुबाईचा बोलबाला, आलिया भट्ट चित्रपटाच्या प्रीमियरसाठी रवाना!