नाहक का असेना, मी जेलयात्री… अडीच वर्ष तुरुंगात काय केलं?; छगन भुजबळ पहिल्यांदाच भरभरून बोलले

| Updated on: Mar 19, 2023 | 1:43 PM

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच तुरुंगातील अनुभव कथन केले आहेत. अडीच वर्ष ते तुरुंगात होते. या काळात ते वेळ कसा घालवायचे? काय करायचे? याची माहिती त्यांनी दिली आहे.

नाहक का असेना, मी जेलयात्री... अडीच वर्ष तुरुंगात काय केलं?; छगन भुजबळ पहिल्यांदाच भरभरून बोलले
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच त्यांच्या तुरुंगातील अनुभवावर भाष्य केलं आहे. भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात होते. नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणाऱ्या भुजबळांनी अडीच वर्ष तुरुंगात काय केलं असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. भुजबळ यांनीही या अडीच वर्षात काय केलं याची माहिती पहिल्यांदाच दिली. या अडीच वर्षाच्या काळात तुरुंगात फक्त पुस्तक आणि वर्तमान पत्र वाचण्याचं काम केलं. चिंतन केलं, मनन केलं, असं भुजबळ यांनी सांगितलं. छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते.

कभी डर ना था मुझे फासला देखकर. मै बढता गया रास्ता देखकर, ख़ुद ब ख़ुद मेरे नज़दीक आती गई, मेरी मंज़िल मेरा हौसला देखकर, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपल्या आयुष्याचं मर्म सांगत या मुलाखतीला सुरुवात केली. आयुष्यात चढउतार असतात. सुखदु:ख आहे. प्रत्येकाची दु:खं वेगळी असतील. त्याची कारणंही वेगळी असतील. पण घरोघरी मातीच्या चुली असतात तसं घरोघरी सुख आहे आणि दु:ख आहे. जे समोर येईल ते स्वीकारायचं. थांबून करणार काय?

हे सुद्धा वाचा

चालत गेलो तर रस्ता मिळतो. थांबल्यावर कसा मिळेल. अडचणी येतात आणि जातात. आयुष्य असंच आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. अनेक लोक माझ्या बद्दल सांगत असतात. हे महापौर झाले, नगरसेवक झाले, आमदार झाले. पण कोणी सांगत नाही हे जेलयात्री आहेत म्हणून. नाहक का असेना पण मी जेलयात्री झालो ना. ही एक पदवी आली ना, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

सकाळी वर्तमानपत्रं, दुपारी पुस्तके

यावेळी त्यांनी अडीच वर्षाच्या तुरुंगवासातील अनुभव सांगितले. तुरुंग म्हटल्यावर भीती वाटणं साहजिकच आहे. अडीच वर्ष तुरुंगात राहावं लागतं तेव्हा तुरुंग काय आहे हे कळतं. तुरुंगात अडचणी असतात, दु:ख असतं, सर्व असतं. मला तुरुंगात पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचं सहकार्य मिळालं, म्हणून मी तुरुंगात टिकू शकलो. मी सकाळी सर्व वर्तमानपत्र वाचायचो आणि दुपारनंतर सर्व पुस्तके वाचायचो. त्यातच वेळ जायचा. त्यामुळे तेव्हा वाटायचं बरं झालं, नाहीतरी पुस्तकं वाचायला वेळ मिळत नव्हता, असं भुजबळ म्हणाले.

तीनदा आजारी पडलो

पण त्या काळात मी आजारीही पडलो. तीन वेळा आजारी पडलो. एकदा तर तुरुंगात तापाने फणफणलो होतो. बेशुद्ध पडलो होतो. बॅरेकजवळ कधी रुग्णवाहिका आणली जात नाही. पण मी बेशुद्ध पडल्यावर आणली गेली. मला कधी हॉस्पिटलला नेलं तेही मला कळलं नव्हतं. नंतर पॅनक्रियाचा आजार झाला. आमदार कपिल पाटील यांच्यासह अनेकांनी माझ्या आजारपणाबाबत विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर कोर्टानेही माहिती घेतली आणि माझ्यावर उपचार सुरू झाले. केईएमच्या डॉक्टरांनी माझ्यावर चांगले उपचार केले. माझ्यासाठी वेगळी रुम दिली. माझ्यासाठी डॉक्टरांची एक टीम आली होती. त्या डॉक्टरांनी ठरवलं यांना वाचवायचंच. त्यामुळे मी तुमच्यासमोर आलो. मी या सर्वांचे आभारी आहे, असं त्यांनी सांगितलं.

आठवणीत रमायचो

तुरुंगात असताना कधी कधी बाहेरच्यांची आठवण येते. भूतकाळातील आठवणी यायच्या. त्या आठवणीत रमायचो. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. त्यावेळच्याही आठवणी येत होत्या.आठवणीत रमणं झालं की पुन्हा वाचन करायचो. असा वेळ माझा तुरुंगात जायचा, असंही त्यांनी सांगितलं.

ठाकरे, पवारांकडून कणखरता आली

माझ्यातील ही कणखरता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आली. बाळासाहेब ठाकरे अनेक संघर्षात ते उभे राहिले. अनेक घाव त्यांनी परतवून लावले. दुसरे म्हणजे शरद पवार यांच्याकडूनही माझ्याकडून कणखरता आली. शरद पवार यांचं 95मध्ये सरकार गेल्यानंतर करायचे काय असा सवाल होता. त्यानंतर शरद पवार यांनी प्रचंड काम केलं. अनेक संकटातून हे दोन्ही नेते गेले आहेत. पवारांवर शारिरीक आणि राजकीय संकट येऊन गेले. या लोकांकडे पाहिल्यावर वाटतं ते जे करतात त्यापुढे आपण काहीच नाही. त्यांना पाहिल्यावर मनात उर्मी येते, असं ते म्हणाले.

एक पाऊल का टाकू शकत नाही?

बाळासाहेबांच्या हृदयात आग होती. पवारांच्या डोक्यावर बर्फ होता. दोन्ही नेत्यांचे मर्मस्थळे वेगळी आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडच्या चांगल्या गोष्टी घेण्याची संधी मिळाली. दोन्ही नेत्यांसोबत काम करायला मिळालं हे माझं अवभाग्य आहे. फुले, शाहू आंबेडकर सावित्रीबाई, शिवाजी महाराज यांचं खूप वाचन केलं. मनन केलं. यातील प्रत्येक व्यक्ती असंख्य संकटातून गेलेल्या आहेत. पण त्या संकटावर मात करून हे लोक एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतात. ते एक लाख पावलं चालत गेले. आपण एक तर टाकू शकतो? का टाकू नये एक पाऊल. ज्याज्या वेळी दु:ख येतं आणि सुख येतं तेव्हा मी असाच शांत असतो. विचलीत होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.