मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब, बळजबरीने अ‍ॅडमिट करणार; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

| Updated on: Aug 12, 2023 | 2:38 PM

बॉडी बॅग प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. अटकेत असलेल्या आरोपींनी अनेकांची नावे घेतली आहेत. त्यामुळे आता अनेक मोठी नावं पुढं येतील. कुठलंही कुटुंब कितीही मोठं असलं तरी चारपैकी एकजण जेलमध्ये जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब, बळजबरीने अ‍ॅडमिट करणार; संजय शिरसाट यांचं मोठं विधान
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद | 12 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील दरे या गावी गेले आहेत. मुख्यमंत्री नेहमी आपल्या गावी जात असल्याने शेतीसाठी ते गावाला गेले असावेत असं सांगितलं जात होतं. पुण्यात चांदणी चौकाच्या उड्डाण पुलाच्या कार्यक्रमालाही मुख्यमंत्री उपस्थित झाले नाहीत. या कार्यक्रमात ते ऑनलाईन सहभागी होणार असल्याचं नंतर सांगण्यात आलं. पण ते ऑनलाईनही आले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. तेवढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती प्रचंड खराब असून त्यांना जबरदस्तीने अ‍ॅडमिट करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास काम करतात हे महाराष्ट्र जाणतो. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरकडे जाण्याची विनंती केली आहे. 15 ऑगस्ट नंतर त्यांना… बळजबरीने हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा. त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही जवळ राहतो. आम्हाला माहितीये, असं संजय शिरसाट म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ते लंडनला गेले नाहीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. एक दिवस त्यांची तब्येत ठिक नव्हती म्हणून ते गावी गेले आहेत. आपल्या गावात जाऊन एक दिवस आराम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ते लंडनला गेले नाहीत, असा टोलाही शिरसाट यांनी ठाकरे गटाला नाव न घेता लगावला.

सुपीक डोक्यातील कल्पना

शिरसाट यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यामधील कोल्ड वॉरच्या चर्चांवरही भाष्य केलं. अजितदादा यांनी वॉर रूममध्ये घेतलेली बैठक असो की मंत्र्याकडून झेंडा वंदन असो, यावरून राज्यात चर्चांना उधाण आले आहे. मात्र सगळे एकत्र येऊन काम करताय हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजितदादांनी वॉर रूममध्ये अतिक्रमण केले नाही. ही कुणाच्यातरी सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना आहे, अशी टीका त्यांनी केली.

राऊतांना अ‍ॅडमिट करा

पालकमंत्रीपदावरूनही कुठलीही नाराजी नाही. जाणीवपूर्वक काही लोक बातम्या पसरवत आहेत. त्यांना काम नाही म्हणून असली विधानं सुरू आहेत, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊतांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. राऊतांना तातडीने उपचाराची गरज आहे. संजय राऊत यांना तातडीने अ‍ॅडमिट करा, असा चिमटा त्यांनी काढला.

मलिकांना राजकारण करू नये

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिाय व्यक्त केली. नवाब मलिक आजारासाठी बाहेर आले. त्यांनी आता राजकारण करू नये. ज्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ती त्यांच्या पक्षाची बाब आहे. आमचा संबंध नाही, असंही ते म्हणाले.

लवकरच अटक होणार

बॉडी बॅग प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. अटकेत असलेल्या आरोपींनी अनेकांची नावे घेतली आहेत. त्यामुळे आता अनेक मोठी नावं पुढं येतील. कुठलंही कुटुंब कितीही मोठं असलं तरी चारपैकी एकजण जेलमध्ये जाणार आहे, असं सांगतानाच कोव्हिड घोटाळाप्रकरणात चौकशी झाली आहे. फक्त अटक बाकी आहे. तीही होईल, असं सूचक विधान त्यांनी केलं. पण कुणाची अटक होणार हे स्पष्ट केलं नाही.