Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले…
दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सीबीआय चौकशी सुरू असलेल्या या प्रकरणात नाव आल्याने त्यांनी सर्व आरोप फेटाळले. ठाकरे म्हणाले की, त्यांचा दिशाशी कधीही संबंध आला नाही आणि हे चारित्र्यहनन थांबवावे अन्यथा कायदेशीर कारवाई करू. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिशा सालियन प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. यात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावांचाही समावेश आहे. या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. आमचं फालतू चारित्र्य हनन करणं बस्सं झालं. नाही तर मला कायदेशीर पावलं उचलावी लागतील, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणाबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांचा भडका उडाला. आमचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही. याबाबत आदित्यने आधीच खुलासा केला आहे. या प्रकरणात कुणाचंही नाव घेतलं जात आहे. उद्या तुमचंही नाव येईन. तुमचंही चारित्र्य हनन होईल. या प्रकरणात आतापर्यंत मोदी आणि ट्रम्प यांचं नाव कसं आलं नाही? याचं मला आश्चर्य वाटतं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
तिला ओळखतच नाही
या प्रकरणात सातत्याने नावं घेतली जात आहेत. होय, हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे. इतके दिवस आम्ही गप्प होतो. कारण सरकारनेच त्यावर एसआयट्या नेमल्या होत्या. त्यांना काय चौकशी करायची ती करू द्यावी म्हणून आम्ही शांत होतो. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत काहीच बोलायचं नाही, असं आम्ही ठरवलं होतं. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. ती मुलगी जिवानिशी गेली. आम्ही तिला ओळखत नव्हतो. तिच्याशी कधी भेट झाली नाही. तिच्याशी काहीही संबंध नाही. काय घडलं त्याच्याशी आमचा संबंध नाही. तरीही आमचं नाव घेतलं जात आहे. फालतू चारित्र्य हनन बस्स झालं, नाही तर आम्हालाही कायदेशीर पावलं उचलावी लागेल, असा संतप्त इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली होती. अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो. मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या सहा वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे., असंही त्यांनी म्हटलं होतं.