औरंगाबादः हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवल्यास शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, प्रवीण दरेकरांचा इशारा

| Updated on: Nov 01, 2021 | 10:26 AM

औरंगाबादमधील गुंठेवारीचा प्रश्न हाताळताना नेमकी कोणती भूमिका घ्यायची यावरून शिवसेनेचा खूप गोंधळ उडालेला दिसत आहे, अशी टीकादेखील प्रवीण दरेकर यांनी केली.

औरंगाबादः हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवल्यास शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, प्रवीण दरेकरांचा इशारा
प्रवीण दरेकर
Follow us on

औरंगाबादः गुंठेवारीमधील हिंदूंची घरं नियमित न केल्यास या वस्त्यांवर बुलडोझर फिरवण्याची धमकावणीची भाषा करणाऱ्या शिवसेनेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार टीका केली. हिंदूंच्या घरावर अशी बुलडोझर फिरवण्याची धमकीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. तसे झाल्याचे ठाकरे सरकार (Maharashtra government) व मनपा प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून मनपा आयुक्त हिटलरशाही पद्धतीने वसुलीची जी टांगती तलवार जनतेच्या गळ्यावर ठेवत आहे त्यातून शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व सिद्ध होते,’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (31 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केली.

गुंठेवारीवरून शिवसेना पक्षातच गोंधळः दरेकर

औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, ‘ औरंगाबादमधील गुंठेवारीचा प्रश्न हाताळताना नेमकी कोणती भूमिका घ्यायची यावरून शिवसेनेचा खूप गोंधळ उडालेला दिसत आहे. पालकमंत्री सुभाष देसाई , मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची भूमिका वेगळी असून शिवसेना पक्षाचीही भूमिका स्वतंत्र असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे आमदार, सरकार आणि प्रशासन यांच्यात कुठलाच ताळमेळ नसल्याचे हे उदाहरण आहे. शिवसेनेने या कारवाईसाठी जाणीवपूर्वक हिंदू वसाहतींना टार्गेट केले आहे. भाजपने मात्र त्याविरोधात आवाज उठवला आहे. आमच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचे शिवसेना नेते सांगत असले तरी राज्यात शिवसेनाच जनतेच्या नजरेतून उतरली आहे. चौथ्या क्रमांकावर गेलेल्या शिवसेनेला आता जनताच गांभीर्याने घेत नाही, असा टाेलाही दरेकर यांनी लगावला.

शिवसेनेने आधी पाणीपुरवठा नीट करावा

महापालिकेची दीर्घकाळ सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला शहराला अद्याप नीट पाणीपुरवठाही करता येत नाही. शहरात . आठ-आठ दिवसाला पाणी मिळणे लाजिरवाणे आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. संपूर्ण खर्च शासन करण्यास तयार होते, पण शिवसेनेने 625 कोटी रुपयांचा भुर्दंड मनपाच्या माथी मारला. महापालिका एवढा निधी कुठून आणणार? अशी विचारणाही दरेकर यांनी केली.

औरंगाबादेत मालमत्ता नियमितीकरणासाठी 31 नोव्हेंबरपर्यंतची मुदत

महाराष्ट्र शासनाने 30 डिसेंबर 2020 पर्यंत बांधलेली अनधिकृत घरे, प्लॉट अधिकृत करण्यासाठी गुंठेवारी योजना अमलात आणली. औरंगाबाद शहरात दीड ते पावणे दोन लाख अनधिकृत घरे असावीत, असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. या घरांना अधिकृत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गुंठेवारी योजना आणली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2020 पूर्वी बांधण्यात आलेल्या घरांचाही या योजनेत समावेश करण्याचा मोठा निर्णय नगरविकास विभागाने घेतला. जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा, हा शासनाचा हेतू आहे. गुंठेवारीत आपल्या घराची फाइल कशा पद्धतीने तयार करावी, यासाठी महापालिकेने तब्बल 52 वास्तुविशारद नेमले. नागरिकांनी या वास्तुविशारदांना एक रुपयाही देण्याची गरज नाही. महापालिका वास्तुविशारदांना प्रत्येक फाइलनुसार शुल्क देणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या फाइल्स दाखल कराव्यात, असे आवाहन पालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे. यासाठी महापालिकेने आता 31 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

इतर बातम्या

एमआयएमच्या ऑडिओ क्लिपने औरंगाबादेत खळबळ, पक्षात फूट पडल्याचे संभाषण

औरंगाबादेत मालमत्ता नियमित करण्यासाठी मुदतवाढ, 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया करण्याची परवानगी