आम्हीही कमी नाही, आम्हीही 54 टक्के आहोत; मनोज जरांगे पाटील यांचा आरपारचा इशारा

| Updated on: Nov 07, 2023 | 12:47 PM

बीड, नांदेडसह महाराष्ट्रातील एसपींवर दबाव आणला जात आहे. पोलिसांवर दबाव आणला जातोय. तुम्हाला काय करायचंय आमची सत्ता आहे. टाका सर्वांना आत असं पोलिसांना सांगितलं जात आहे. टाका सर्वांना आत म्हणजे? आम्ही शांततेत आंदोलन करणारे आहोत. आम्ही केसेसला घाबरत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आम्हीही कमी नाही, आम्हीही 54 टक्के आहोत; मनोज जरांगे पाटील यांचा आरपारचा इशारा
Manoj Jarange Patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संभाजी नगर | 7 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. तसेच जातीय जनगणना करण्याची मागणीही भुजबळ यांनी केली आहे. भुजबळांच्या या विधानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. आम्हीही थोडे नाही. आम्हीही एकटे मराठेच 54 टक्के आहोत. आम्ही शांततेत आंदोलन करणार. पण तुम्ही आव्हानच देणार असाल तर आमचाही नाईलाज आहे. चालू द्या मग. तुमचे 54 टक्के आहे का? जनगणनाच होऊ द्या आता. देशात आम्ही जवळपास 32 कोटी आहोत. आम्हीही काही कमी नाही. राज्यातही आम्ही 54 ते 60 टक्के आहोत. तुम्ही आम्हाला त्या वाटेवर येऊ देऊ नका. हात जोडून सांगतो. आमच्या पोरांना त्रास देऊ नका, असा निर्वाणीचा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांनी ओबसी नेत्यांवर गंभीर आरोप केले. मराठा समाज खचेल. मराठा समाजाचं कल्याण होणार नाही. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करायचं, मग आपला डाव यशस्वी झाला असं षडयंत्र ओबीसी नेत्यांचं सुरू आहे. हे खचले, केसेसला घाबरले, मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं केलं तर ते मागे हटतील, असं त्यांना वाटतंय. मराठ्यांचं शांततेत आंदोलन थोपवता येत नसल्यानेच हा डाव सुरू आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मग नेत्याफित्यांची गरज नाही

आमचं आंदोलन डोळ्यात खुपू लागल्यानेच मराठ्यांच्या पोरांवर खोटेनाटे डाव टाकले जात आहेत. केसेस दाखल केल्या जात आहेत. हे थांबवा. तुम्ही नाही थांबवलं तर आम्ही समर्थ आहोत. आम्हालाही पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. मग आमच्यापुढे पर्याय नसेल. पुन्हा गावबंदीच्या निर्णयाकडे आम्हाला येऊ देऊ नका. मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या पाठी उभे राहावं. ओबीसी नेते त्यांच्या समाजाच्या पाठी जाहीर उभे आहेत. तुम्हीही राहा. तुम्ही नाही राहिले तर आम्ही खंबीर आहोत. तुम्ही उभं राहिला नाही तर आम्हाला कोणत्या नेत्याफित्याची काही गरज नाही. बघा मग आम्हाला पूर्वीच्या भूमिकेवर यावेच लागणार आहे, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला.

एवढी जळजळ का?

निवृत्त न्यायाधीशांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला होता. त्यावरही जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. न्यायाधीशांना कुणी पाठवलं हे मला माहीत नाही. पण न्यायाधीश जनतेत येऊ शकतात. जनता दरबार घेऊ शकतात. न्यायदान करणारे लोक जनतेत गेले तर तुम्हाला काय अडचण आहे? भुजबळांना एवढी जळजळ वाटण्याचं कारण काय? भुजबळांना मराठ्यांबद्दल एवढा आकस आणि जळजळ का आहे? असा संतप्त सवाल करतानाच ओबीसी नेत्यांनाही भुजबळ हे दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचं वाटत असल्याचा दावाही जरांगे यांनी केला.