Marathwada Weather : देर आऐ..दुरुस्त आए…मराठवाड्यातही मान्सून सक्रीय, पुढच्या दोन दिवसांचा अंदाज काय?

| Updated on: Jul 05, 2022 | 5:45 PM

मराठवाड्यात पावसाअभावी शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली होती. मात्र, पिकांना ओढ मिळाल्याने पिके सुकली आहे. तर आता 75 ते 100 मिमी पाऊस झाला असेल तरच खरिपाची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Marathwada Weather : देर आऐ..दुरुस्त आए...मराठवाड्यातही मान्सून सक्रीय, पुढच्या दोन दिवसांचा अंदाज काय?
Follow us on

औरंगाबाद : राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाल्यापासून मराठवाड्यावर अवकृपाच राहिली आहे. सरासरी सोडा खरीप पेरणी लायकही पाऊस झाला नव्हता. त्यामुळे खरिपाचे काय होणार ही चिंता सतावत असताना जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चित्र बदलले आहे. हवामान विभागाने (Meteorological department) वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून आगामी 24 तासांमध्ये देखील या विभागात पाऊस सक्रीय राहणार आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पण मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. तर 7 जुलै रोजी औरंगाबाद (Aurangabad Rain), जालना, परभणी आणि हिंगोली तर 8 जुलै रोजी औरंगाबाद, जालना जिल्ह्यात वरुणराजाची कृपादृष्टी राहणार आहे.

पुढील तीन दिवस अशी राहणार स्थिती

हवामान विभागाने 8 जुलैपर्यंत पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे सांगितले आहे. चार दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामध्ये 5 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तर 6 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड तर 7 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली,नांदेड जिल्ह्यात व 8 जुलैरोजी औरंगाबाद, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

जुलै महिन्यात बदलली परिस्थिती

राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून केवळ कोकण आणि मुंबई या भागातच महेरबान झाला होता. मात्र, 1 जुलैपासून मराठवाडा विभागातही सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी येथे कृपादृष्टी झाली आहे. त्यामुळे रखडलेली खरीप कामे वेगात सुरू झाली आहेत. शिवाय 8 जुलैपर्यंत पावसामध्ये सातत्य राहणार आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्याही होतील आहे उगवण झालेल्या पिकलाही नवसंजीवनी मिळेल.

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला

संबंध जून महिन्यात एकदाही समाधानकारक पाऊस मराठवाड्यात बरसलेला नव्हता. शिवाय हवामान खात्याने अंदाज वरतूनही या विभागाला पावसाने कायम हुलकावणी दिली होती. पण गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सक्रिय तर झाला आहेच पण जोरही वाढला आहे. त्यामुळे उशिरा दाखल झालेला पाऊस कायम असाच रहावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ओल बघा अन् चाढाल्यावर मूठ ठेवा

मराठवाड्यात पावसाअभावी शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली होती. मात्र, पिकांना ओढ मिळाल्याने पिके सुकली आहे. तर आता 75 ते 100 मिमी पाऊस झाला असेल तरच खरिपाची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाला आहे. असे असले तरी कृषी सहाय्यकाच्या सल्ल्यानेच पेरणी करणे फायद्याचे ठरणार आहे