काय सांगता? पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते, औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जावईशोध!

| Updated on: Nov 16, 2021 | 11:53 AM

केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही. केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते. त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही, असे अजब वक्तव्य करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली.

काय सांगता? पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते, औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जावईशोध!
पेट्रोलच्या किंमतींबाबत वक्तव्य करून रावसाहेब दानवे चर्चेत
Follow us on

औरंगाबादः आपल्या विनोदी आणि टोले मारण्याच्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजब वक्तव्य केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Diesel Price) या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने काढलेल्या महागाईच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं.

महागाई विरोधातल्या मोर्चाबाबत दिली प्रतिक्रिया

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या अजब वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेसने महागाईविरोधात काढलेल्या मोर्चावर त्यांनी नुकतीच औरंगाबादमध्ये प्रतिक्रिया दिली. शहरातील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे म्हणाले, इंधनाच्या वाढत्या दरांवर यांनी मोर्चे काढले. पण काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या आहेत. केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही. केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते. त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही. असे असतानाही आपण केंद्र सरकारने आपला कर कमी केला. पण राज्य सरकार राज्यातील कर कमी करण्यास तयार नाही. हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर चालतो. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत, अशी टीकाही दानवे यांनी केली.

‘हिंमत असेल तर एक तरी झोपडी पाडून दाखवा’

तसेच औरंगाबाद शहरात गुंठेवारी प्रकरणी महापालिकेकडून विविध मालमत्ता नियमितीकरणाचे काम सुरू आहे, त्यावर भाष्य करताना रावसाहेब दानवे म्हणाले, महापालिका प्रशासकांकडून धमकावण्याचे काम सुरु आहे. मात्र पालकमंत्री आले आणि त्यांनी स्थगिती दिली. एकिकडे लोकांना धाक दाखवायचा आणि दुसरीकडे स्थगिती देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे दाखवायचे, तुमच्यात दम असेल तर एक झोपडी पाडून दाखवा. भाजप एकही झोपडी पडू देणार नाही. शिवसेनेने गुंठेवारी असो की झोपडपट्टी असो. एकाही घराला हात लावला तर रस्त्यावर फिरणे मुश्कील करू, असा इशारादेखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना दिला.

इतर बातम्या-

समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचा काय संबंध आहे? काशिफ आणि व्हाईट दुबईला अटक का केली जात नाही?; मलिक यांचा एनसीबीला सवाल

साहित्य संमेलनात राजकीय राबता, समारोपाला पवार, मुख्यमंत्रीही लावणार हजेरी; उद्घाटक मात्र ठरेना!