मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी इम्तियाज जलील करणार गांधीगिरी, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाही आक्रमक

| Updated on: Sep 14, 2021 | 7:07 PM

पाच वर्षे आमदार व दोन वर्षे खासदार राहिलेले इम्तियाज जलील यंदा प्रथमच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य सोहळ्याला उपस्थिती लावतील. औरंगाबादच्या राजकारणात एमआयएमच्या या निर्णयाला मोठे महत्त्व आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी इम्तियाज जलील करणार गांधीगिरी, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाही आक्रमक
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी इम्तियाज जलील करणार उपरोधिक आंदोलन
Follow us on

औरंगाबाद: येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackrey) विशेष उपस्थिती असेल. उद्धव ठाकरेंच्या हस्ते या दिवशी विविध विकासकामांचे भूमिपूजन तथा उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे. हाच मुहूर्त साधत मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आणि एमआयएम आंदोलन करणार आहेत. शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात शहर आणि परिसरात अनेक विकासकामे केल्यामुळे त्यांचे आभार मानत, या दिवशी मुख्यमंत्र्यांवर एमआयएमतर्फे पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेही आक्रमक होणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चा ठाकरेंची गाडी रोखणार

उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. येत्या 17 सप्टेंबर रोजी मुख्यंत्र्यांची गाडी रोखू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. तसेच ठाकरेंची गाडी रोखून आरक्षणाशी संबंधित जे जीआर असतील त्यांची होळी करण्यात येईल अशी माहितीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.

शिवसेनेच्या ‘सुपर संभाजीनगर’वर निशाणा

औरंगाबाद हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेने शहरात ‘सुपर संभाजीनगर’ ही पुस्तिका वाटपाचे काम हाती घेतले असून याद्वारे शिवसेनेने शहरात काय काय विकासकामे केली याची यादी त्यात वाचून दाखवण्यात आली आहे. याच प्रचारावर निशाणा साधत 17 सप्टेंबर रोजी खासदार इम्तियाज जलील मुख्यमंत्र्यांसमोर उपरोधिक निदर्शने करणार आहे. शहरात आंदोलनाला परवानगी नाही. त्यामुळे एमआयएमतर्फे त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुष्पवृष्टी आणि तुतारी वाजवून स्वागत केले जाईल.

विकासकामांचे बॅनर दाखवणार

शहरातील नागरिकांना 4-5 दिवसांच्या फरकाने पाणी मिळते, काही ठिकाणी अत्यंत गढूळ पाणी येते, शहरातील काही भागांतील विकासकामांचे पितळ मागील आठवड्यातील पावसाने उघडे पडले आहे, राज्य सरकारच्या धोरणामुळे असंख्य तरुण बेरोजगार आहेत, औरंगाबादेत होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थानांतरीत करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आदी ‘विकास’ कामांचे बॅनर यावेळी मुख्यमंत्र्यांना दाखवून त्यांना धन्यवाद दिले जाईल. एआरपोर्टपासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत एमआयए कार्यकर्ते हे बॅनर लावतील.

जलील यंदा प्रथमच मुक्ती संग्राम दिनाला हजेरी लावणार

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे आजपासून 70 वर्षांपूर्वी रझाकारांपासून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले होते. इम्तियाज जलील हे मागील दोन वर्षांपासून शहराचे खासदार तसेच त्यापूर्वी पाच वर्षे आमदार राहिले आहेत. मात्र आजवर त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या एकाही कार्यक्रमात हजेरी लावली नाही. यंदा मात्र ते प्रथमच मुख्य समारंभात उपस्थित राहतील, अशी घोषणा मंगळवारी जलील यांनी केली. त्यामुळे कट्टरतेसाठी प्रसिद्ध असलेल्या एमआयएमनेही काहीसे मवाळ धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.

इतर बातम्या- 

लोकसभा निवडणुकीतील जायंट किलर, पत्रकार ते खासदार, कोण आहेत इम्तियाज जलील?

इम्तियाज जलील म्हणाले, बाप्पा संपूर्ण जगावरील कोरोनाचे विघ्न दूर करो… तर माजी खासदार खैरे म्हणाले, कोरोना पाकिस्तानात जावो…