Aurangabad Alert : नगरमध्ये एकूण 68 गावांत लॉकडाऊन,औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी

| Updated on: Oct 06, 2021 | 12:03 PM

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी मनपा हद्दीत 02 आणि ग्रामीण भागात 14 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर उपचार घेऊन 16 रुग्ण घरी परतले. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

Aurangabad Alert : नगरमध्ये एकूण 68 गावांत लॉकडाऊन,औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. त्या औरंगाबादच्या शेजारचा (Aurangabad District) जिल्हा अहमदनगरचा (Ahmednagar) समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात दररोज 400 ते 500 नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. काल म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात एकूण 413 रुग्णांना कोरोनाची (Corona Positive Cases) बाधा झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरहून येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी केली जात आहे.

नगरहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी

अहमदनगरहून औरंगाबाद शहरात येणाऱ्या प्रत्येक बसमधील प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. यासाठी नगर नाक्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लसीचे प्रमाणपत्र अन्यथा चाचणी बंधनकारक

नगरमार्गे अनेक प्रवासी एसटी महामंडळाच्या बसमधून औरंगाबादला येतात. खासगी वाहनांनी औरंगाबाद येथे येणाऱ्यांची संख्यादेखील खूप आहे. त्याामुळे नगरमध्ये पसरलेले कोरोनाचे लोण प्रवाशांच्या माध्यमातून औरंगाबादेत पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनेही उपाययोजना केल्या आहेत. 05 ऑक्टोबरपासून नगरहून औरंगाबादेत येणारी प्रत्येक बस रोखली जाऊन, त्यातील प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांची मात्र चाचणी केली जाणार नाही. मात्र या प्रवाशांना लसीचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र नसेल तर कोरोना चाचणी करावी लागेल. कोरोना चाचणीसाठी नगर नाक्यावर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

नगरमध्ये आणखी आठ गावांमध्ये लॉकडाऊन

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अहमदनगरमधील आठ गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. त्यानुसार आता जिल्ह्यात बंद असलेल्या गावांची एकूण संख्या 68 वर गेली आहे. 05 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून दहा दिवस म्हणजेच 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत या गावांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात शाळा, धार्मिक स्थळांसह, दुकाने, वस्तू विक्री, सेवा बंद राहणार आहेत. नागरिकांनाही गावात येण्यास व बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

औरंगाबादेतील कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी मनपा हद्दीत 02 आणि ग्रामीण भागात 14 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर उपचार घेऊन 16 रुग्ण घरी परतले. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील विविध मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. मात्र या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देणे, याकडेही प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणून औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक मंदिर आणि धार्मिक स्थळांवर मास्क घातल्याशिवाय कोणत्याही भाविकाला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच खबरदारी म्हणून वृद्ध तसेच लहान मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील रागांमधील भाविकांमध्येही विशिष्ट अंतर ठेवण्याची नियमावली प्रशासनातर्फे मंदिर व्यवस्थापनाला देण्यात आली आहे.

 

 

इतर बातम्या- 

Aurangabad: महापालिका उभारणार सात चार्जिंग स्टेशन अन् ई-कारही खरेदी करणार, नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पालिकेची तयारी

Aurangabad | औरंगाबादमध्ये नुकसान भरपाईसाठी तरुण शेतकऱ्याचं जलसमाधी आंदोलन