औरंगाबादमधील ऐतिहासिक दरवाजांचे नूतनीकरण व संवर्धनाला वेग, चार महिन्यात चित्र कामे पूर्ण होणार!

| Updated on: Oct 29, 2021 | 12:07 PM

शहरातील दरवाजांच्या नूतनीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वीच हाती घेण्यात आले होते.मात्र कोरोना काळामुळे कामाला ब्रेक लागला होता. त्यानंतर पावसाळ्यामुळे कामात अडथळे आले. आता मात्र हे काम वेगाने पूर्ण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबादमधील ऐतिहासिक दरवाजांचे नूतनीकरण व संवर्धनाला वेग, चार महिन्यात चित्र कामे पूर्ण होणार!
शहरातील सर्व दरवाजांचे नूतनीकरण व सुशोभिकरण लवकरच पूर्ण करणार.
Follow us on

औरंगाबादः पर्यटन नगरी, ऐतिहासिक नगरी औरंगाबादचे वैभव (City of Gates) म्हणजे येथील 52 दरवाजे. सध्याच्या स्थितीत त्यापैकी केवळ 9 दरवाजेच शिल्लक राहिले आहेत. तरीही शहरातील विविध भागात उभ्या असलेले हे प्राचीन दरवाजे औरंगाबादचा (Historical Aurangabad) इतिहास सांगतात. गेल्या काही वर्षांपासून या दरवाज्यांची पडझड होत आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (Smart city Development corporation) माध्यमातून शहरातील 9 दरवाज्यांच्या नूतनीकरण व संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. यापैकी आठ दरवाजाच्या कामासाठी आणखी चार महिने लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

9 दरवाज्यांच्या संवर्धनाचे काम अग्रक्रमाने

शहरातील 9 दरवाजांच्या नूतनीकरणासाठी महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक दरवाज्यांचे सुशोभिकरण व संवर्धनाच्या कामाला मंजुरी घेतली आणि हे काम सुरु करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या स्नेहा बक्षी या उपक्रमाच्या प्रकल्प व्यवस्थापक आहेत. त्यांच्या देखरेखीखाली दरवाजांच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यात कटकट गेट, रोषन गेट, पैठण गेट, खिजरी गेट, नौबत गेट, जाफर गेट, बारापुल्ला गेट, महेमूद गेट, रंगीन गेट यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे नूतनीकरणाला लागला होता ब्रेक

शहरातील दरवाजांच्या नूतनीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वीच हाती घेण्यात आले होते.मात्र कोरोना काळामुळे महापालिकेची यंत्रणा त्या कामाकडे वळवण्यात आली होती. म्हणून नूतनीकरणाच्या कामाला ब्रेक लागला होता. आता कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यावर काम सुरु करण्यात आले. मात्र ऑगस्टपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा या कामात अडथळे येऊ लागले. आता मात्र कोरोना आणि पावसाचे सावट कमी झाल्याने दरवाजांच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती स्नेहा बक्षी यांनी दिली.

दरवाजांभोवती हिरवळही बहरणार

स्नेहा बक्षी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरवाजांवर आता रंगकामाचा अंतिम हात फिरवणे बाकी आहे. येत्या काही दिवसात हे कामदेखील पूर्ण होणार आहे. दरवाजांच्या परिसरात लँडस्केपिंगचे काम हाती घेतले जाणार आहे. याद्वारे दरवाजांच्या परिसरात हिरवळ बहरवण्यात येणार आहे. तसेच शोभेची झाडेही या परिसरात लावली जातील.

मेहमूद दरवाजाच्या नूतनीकरणासाठी निविदा

शहरातील मेहमूद दरवाजाचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे कामही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. हा दरवाजा मोडकळीस आल्यामुळे त्याची वेगळी निविदा काढून त्याचेही काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. पाणचक्कीच्या बाजूला असलेल्या या दरवाजाच्या वरील भागाची पडझड झाली आहे. याच्या डागडुजीकरिताही चार महिने लागतील, अशी माहिती बक्षी यांनी दिली.

इतर बातम्या-

‘आपला शेजारी खरा पहारेदार’, सुरक्षित दिवाळीसाठी औरंगाबाद शहर पोलिसांचे अभियान, नागरिकांसाठी काय आहेत सूचना?

सिडको वाळूज महानगराचे औरंगाबाद महापालिका हस्तांतरण कामाला वेग, सुविधांचे होणार संयुक्त सर्वेक्षण