मोठी बातमी:  नमामि गंगे योजनेत औरंगाबादच्या खाम नदीचा समावेश, देशात नदीकाठची 30 तर महाराष्ट्रातील दोन शहरे

| Updated on: Oct 05, 2021 | 11:04 AM

नमामि गंगे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खाम नदीचा समावेश केला. आता प्रकल्प अहवाल सादर करुन मंजुरी मिळाल्यानंतर केंद्राकडून महापालिकेला नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस निधी मिळेल. यामुळे नदीकाठच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण रोखण्याकरिता वापरला जाणार आहे.

मोठी बातमी:  नमामि गंगे योजनेत औरंगाबादच्या खाम नदीचा समावेश, देशात नदीकाठची 30 तर महाराष्ट्रातील दोन शहरे
औरंगाबादेतील खाम नदीच्या स्वच्छतेच्या कामाची दखल केंद्र सरकारनेही घेतली.
Follow us on

औरंगाबाद: तमाम औरंगाबादकरांसाठी (Aurangabad city) महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमामि गंगे मिशनमध्ये (Namami Gange Mission) औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आला आहे. एवढे दिवस केंद्राचा हा उपक्रम गंगा नदी आणि गंगेच्या काठी असलेल्या गावांपुरताच मर्यादित होता. मात्र आता ज्या शहरांतून नदी वाहते किंवा जी शहरे नदीच्या काठावर वसलेली आहेत, त्यांचाही या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत देशातील तीस शहरांची निवड करण्यात आली असून त्यात औरंगाबादचा समावेश आहे.

नदीकाठच्या शहरांच्या गटात औरंगाबाद व पुणे

नदीच्या काठावर वसलेली शहरे किंवा ज्या शहरांतून नदी वाहते, अशा शहरांचे एक संघटन अर्थात रिव्हर सिटी अलायन्स केंद्र सरकारने तयार केले आहे. यात देशातील तीस शहरांचा समावेश असून त्यात महाराष्ट्र आणि पुणे या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. औरंगाबाद महापालिकेतर्फे खाम नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरु असून पुणे महापालिकादेखील मुळा-मुठा नदीच्या संदर्भाने काम सुरु आहे. या दोन्ही शहरांतील कामाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे, अशी माहिती सोमवारी औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

नमामि गंगे ची महत्त्वाची बैठक संपन्न

सोमवारी एमएमसीजीच्या शिवानी सक्सेना, एनआययूएचे संचालक हितेश वैद्य, रिव्हर सिटी अलायन्सचे राजीव रंजन मिश्रा, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अन्य राज्यांतील सनदी अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात प्रकल्पाच्या प्राथमिक माहितीवर चर्चा करण्यात आली.

खाम नदीला मिळणार नवसंजीवनी

काही शतकांपूर्वी खाम नदी औरंगाबाद शहरातून खळाळून वाहत होती. स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे तिचे पाणी स्वच्छ होते. मात्र 1970 नंतर हर्सूल तलावापासून पुढे नागरी वसाहती वाढल्या. अनेकांनी नदीपात्रात घरे बांधली. ड्रेनेज वाहिन्या सोडल्या. कचरा टाकणे सुरु झाले. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत गेले. 2004-2005 मध्ये सामाजिक चळवळीतील नेत्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. पण ती फार काळ प्रभावी ठरली नाही. त्यानंतर मागील वर्षी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी नदी पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेतली. लोकसहभाग व महापालिकेतरत्फे सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली. त्याची माहिती त्यांनी नमामि गंगे योजनेचे महासंचालक राजीव रंजन मिश्र यांना दिली. औरंगाबादेतल्या खाम नदीला संजीवनी देण्यासाठी सुरु असलेल्या कामांमुळे ते प्रभावित झाले. त्यामुळे त्यांनी नमामि गंगा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खाम नदीचा समावेश केला. आता प्रकल्प अहवाल सादर करुन मंजुरी मिळाल्यानंतर केंद्राकडून महापालिकेला नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस निधी मिळेल. यामुळे नदीकाठच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण रोखण्याकरिता वापरला जाणार आहे.

नमामि गंगा योजना काय आहे?

केंद्र सरकारने 13 मे2015 रोजी गंगा आणि सहाय्यक नद्यांच्या संरक्षणासाठी नमामि गंगा योजनेला मंजुरी दिली. त्यात ऑगस्ट 2021 पर्यंत 30,225 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 11,842 कोटी रुपये खर्च झाले आहेत. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात नदीकाठावरील 300 पैकी 30 शहरांचा समावेश झाला आहे. यात राज्यातील औरंगाबाद व पुण्याची निवड झाली आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Gold: सराफा बाजारात एकदा फेरफटका माराच, सोने-चांदी स्वस्त, नव-नवीन वस्तुंचीही आवक

Aurangabad Tourism: म्हैसमाळला जाण्याचा रस्ता वर्षभरात दुरुस्त करणार, 19 कोटींचा निधी, तीन वर्षांपासून रखडले काम