Aurangabad Top 5: जाणून घ्या औरंगाबाद शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पाच बातम्या मोजक्या शब्दात

| Updated on: Sep 16, 2021 | 10:50 AM

आज 12 राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्ष, वित्तमंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक आणि उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्तच्या कार्यक्रमांमुळे औरंगाबादेत मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Aurangabad Top 5: जाणून घ्या औरंगाबाद शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पाच बातम्या मोजक्या शब्दात
औरंगाबादमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ऑनलाइन मार्गदर्शन करतील.
Follow us on
  1. केंद्रीय अर्थमंत्र्यांसह बँक अध्यक्षांची आज महत्त्वाची बैठक

    देशातील 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक यंदा प्रथमच औरंगाबाद येथे भरत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad)यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात प्रथमच ही बैठक आज 16 सप्टेंबर रोजी होत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणाऱ्या या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचीही सायंकाळच्या चर्चासत्रात उपस्थिती राहणार असल्याची माहिती डॉ. कराड यांनी दिली. या बैठकीत डिजिटल इंडिया, मुद्रालोन, ऑनलाइन कृषी कर्जवाटप आदी सामान्यांसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

  2.  वाळूज सिडकोतून महानगरपालिकेच्या हद्दीत येणार

    औरंगाबादकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे सिडको वाळूज महानगर प्रकल्प टप्पा-1 मध्ये सिडकोने विकसित केलेल्या वसाहती महानगरपालिकेच्या हद्दीत आणण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यासंदर्भातील संयुक्त समिती स्थापन केली असून 45 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास सात गावांतील 1714 हेक्टर क्षेत्र मनपाच्या ताब्यात येईल. या परिसरातील नियोजित आंतरराष्ट्रीय स्टेडियम, ग्रोथ सेंटर आणि शेकडो कंपन्यांमुळे कोट्यवधींचा महसूल मिळू शकतो.

  3. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची जय्यत तयारी

    उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विशेषत्वाने उपस्थित राहणार आहे. या वेळी शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल. तसेच संतांनी दिलेली शिकवण अभ्यासण्यासाठी महत्त्वाचे केंद्र पैठण येथे साकारत आहे. पैठम येथील ही संतपीठाची इमारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वाधीन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून संत वाड्मयाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना येथे प्रवेश देण्यात येईल. या इमारतीचे उद्घाटनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल. तसेच मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर विविध राजकीय पक्षांनीही आपल्या मागण्यांकरिता तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर रोष व्यक्त करण्याकरिता आंदोलनांचे नियोजन केले आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही उद्याचा दिवस औरंगाबाद व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

  4. शहरात डेंग्यूचा धोका वाढला, 40 डेंग्यू पॉझिटिव्ह, 44 संशयित

    गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, फ्लू आदी आजारांची लक्षणं असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. गेल्या 15 दिवसात शहरात 40 रुग्णांची डेंग्यूची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये 44 संशयित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णांमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत आहे. डेंग्यूचा हा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारपासून 14 वॉर्डांमध्ये धूर, औषध फवारणी सुरु केली आहे.

  5. जायकवाडी धरणातील जलसाठा 66 टक्क्यांच्या पुढे

    औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण बुधवारी संध्याकाळ 6 वाजेपर्यंत 66 टक्के भरल्याची माहिती, धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून मंगळवारी मोठ्या प्रमाणवार पाण्याची आवक सुरु झाली. बुधवारी सकाळपासून जायकवाडी धरणात 57,456 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु होती. त्यामुळे मागील 12 तासांत धरणाच्या जलसाठ्याच पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात पावसाने उगडीप दिल्याने तेथील धरणांतून येणारा पाण्याचा विसर्ग घटवण्यात आला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातून होणारा विसर्गही काही प्रमाणात कमी झाला आहे. तरीही गुरुवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणातील पाणीसाठा 70 टक्क्यांपर्यंत होईल, अशा अंदाज धरण अभियंता विजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या- 

Aurangabad Gold: सोन्याचे भाव शंभर रुपयांनी वाढले, जाणून घ्या औरंगाबादेतल्या सराफा मार्केटमधील दर

हेल्मेट न घातल्याने 22 पोलिसांना दंड, औरंगाबाद वाहतूक पोलिसांची कारवाई, हेल्मेटशिवाय आयुक्तालयात एंट्री नाही