महायुतीचं 8 लोकसभा, 46 विधानसभा मतदारसंघांवर लक्ष्य?; मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अर्थ काय?

राज्य मंत्रिमंडळाची उद्यापासून दोन दिवस मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक होत आहे. तब्बल सात वर्षानंतर पहिल्यांदाच मराठवाड्यात ही बैठक होत आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही बैठक होत असल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.

महायुतीचं 8 लोकसभा, 46 विधानसभा मतदारसंघांवर लक्ष्य?; मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अर्थ काय?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2023 | 12:19 PM

औरंगाबाद | 15 सप्टेंबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची उद्यापासून औरंगाबादमध्ये बैठक होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार असून बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यासाटी जय्यत तयारी झाली आहे. औरंगाबादमधील सर्व हॉटेल्स आणि विश्रामगृहे बूक करण्यात आली आहेत. तब्बल सात वर्षानंतर पहिल्यांदाच मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांचंही लक्ष लागलं असून या बैठकीचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत.

तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये ही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्याकरता प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाचा मोठा कडेकोट बंदोबस्त या निमित्ताने असणार आहे. येत्या 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा 75 वा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे उद्या 16 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. मराठवाड्याचा राहिलेला अनुशेष हा भरून काढण्यात येणार का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचा ठरणार आहे..

400 अधिकारी, 75 निर्णय

या बैठकीसाठी 29 मंत्री, 39 स्वीय सहायक, सचिव आणि 400 अधिकारी औरंगाबादमध्ये येणार आहेत. यानिमित्ताने शहरात 300 वाहने दाखल होणार आहेत. या सर्वांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीसाठीचे सर्व हॉटेल्स आणि विश्रामगृहे बूक करण्यात आली आहेत. या बैठकीत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी 75 निर्णय घेतले जाणार आहेत. यावेळी अनेक फाईल्स मार्गी लागणार आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

मिटिंग केवळ बहाणा?

दरम्यान, उद्या होणाऱ्या औरंगाबादमधील कॅबिनेटच्या मिटिंगचे अनेक अर्थ काढले जात आहेत. या बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, या बैठकीच्या माध्यमातून मराठवाड्यात महायुती मजबूत करणं हा सुद्धा या सरकारचा प्लॅन असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत.

तर लोकसभेच्या औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, नांदेड आणि परभणी मिळून 8 जागा आहेत. मराठवाड्यात ठाकरे गटाचे वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडचा मतदार आपल्याकडे ओढण्यासाठी शिंदे आणि भाजप यांच्या प्रयत्न सुरू आहे. औरंगाबादमधील बैठकीतून हा प्रयत्न करण्यात येत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.