प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन होणार, आमदार होणार, या चर्चांवर अखेर बच्चू भाऊंनी जे काय खरं आहे ते सांगून टाकलं

Bachchu Kadu : प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार का? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे.

प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन होणार, आमदार होणार, या चर्चांवर अखेर बच्चू भाऊंनी जे काय खरं आहे ते सांगून टाकलं
Bachchu Kadu
| Updated on: Apr 29, 2026 | 12:46 PM

मागच्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार, ते आपला प्रहार पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यावर आज स्वत: बच्चू कडू यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सर्वप्रथम प्रहार पक्षाने जनतेसाठी काय केलं? त्यांनी आतापर्यंत किती विषय मार्गी लावले? त्याचा पाढा वाचून दाखवला. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार का? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “विलीनीकरणाचा प्रस्ताव मला माध्यमातून समजला. ओझरती भेट झाली होती. तेव्हा चर्चा झालेली. फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यात स्पष्टता नव्हती. सामंत साहेबांसोबत फोनवरुन चर्चा झालेली” असं बच्चू कडू म्हणाले.

पक्ष विलिनीकरणासाठी चर्चा महत्वाची आहे असं ते बोलले. याचा अर्थ अजून शिवसेना आणि त्यांच्यात पक्ष विलीनीकरणाबद्दल ठोस चर्चा झालेली नाही हे स्पष्ट होतय. शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासंबंधीही अजून काही ठोस निर्णय झालेला नाही हे बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी अजून फोन आलेला नाही. फॉर्म भरण्यासाठी किती वेळ लागतो, कागदपत्र बॅगतच असतात हो, असं कडू म्हणाले.

म्हणून खंत व्यक्त केली

“पक्ष विलिनीकरणाच्या बातम्यांबद्दल वाचून दु:ख वाटलं. मी जुना शिवसैनिकचं आहे. मी शिवसेनेतून बाहेर पडून प्रहार काढली. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. विधानसभेच्या वेळी शिंदे साहेबांबरोबर युती करता आली असती पण नाही केली. सामान्य माणसाचा भिडू म्हणजे बच्चू कडू. प्रमाणिकपणे काम करुन संघटना मोठी केली असं बच्चू कडू म्हणाले. आजचं राजकारण धर्माच्या ताकदीवर चालतय. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागे रहावं लागतय” या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

एवढा नालायक बच्चू कडू नाही

“एका आमदारकीसाठी जावा एवढा नालायक बच्चू कडू नाही. प्रहार एक लाख सभासद असणारी संघटना आहे. पाच ते दहा लाख दिव्यांग आमच्याशी जोडलेले आहेत. प्रहार ही कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली संघटना आहे. जाती, धर्मावर आधारित निर्माण झालेली संघटना नाही” असं बच्चू कडू यांनी सांगितलं. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची शक्यता त्यांनी फेटाळली नाही. पण अजून त्या संदर्भात चर्चाच झालेली नाही हे त्यांनी सांगितलं.

 

Follow Us