एकनाथ शिंदेंसोबतच्या गुप्त बैठकीनंतर सर्वच बदललं, बच्चू कडूंनी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडणार?
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आपला पक्ष शिवसेनेत विलीन करून आज विधानपरिषदेसाठी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी आपला राजकीय पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. आज बच्चू कडू विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेनेकडून आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. या निर्णयामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
राजकीय पुनरागमन
बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. त्यानंतर त्यांनी प्रहारच्या माध्यमातून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. मात्र, आता पुन्हा एकदा ते आपल्या मूळ पक्षात परतत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात वर्षा बंगल्यावर प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष विलीनीकरण आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ प्रहार राजकीय पक्ष अधिकृतपणे शिवसेनेत विलीन केला जाणार असून बच्चू कडू यांची प्रहार सामाजिक संघटना मात्र पूर्वीप्रमाणेच आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखून सामाजिक कार्याला प्राधान्य देणार आहे. या विलीनीकरणानंतर आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत बच्चू कडू यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार असून, त्याचाच भाग म्हणून आज ते आपला अर्ज भरतील.
शिवसेनेसाठी बच्चू कडू गेमचेंजर का ठरतील?
बच्चू कडूंच्या या निर्णयामुळे शिवसेने शिंदे गटाला विदर्भासह राज्यस्तरावर अनेक फायदे होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेकडे विदर्भात सध्या असा कोणताही मोठा चेहरा नाही जो लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच आक्रमक आहे. बच्चू कडू यांच्या रूपात शिवसेनेला एक मास लीडर मिळेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहारचे गावपातळीवर मोठे नेटवर्क आहे. हे नेटवर्क आता थेट शिवसेनेच्या कामात येईल.
एकेकाळी अमरावती हा शिवसेनेचा गड मानला जायचा. गेल्या काही वर्षांत ही पकड ढिली झाली होती. बच्चू कडूंच्या एन्ट्रीने या गडाची पुनर्बांधणी करणे शिवसेनेला सोपे जाईल. बच्चू कडू यांनी गेल्या २५-३० वर्षांत शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर मोठी आंदोलने केली आहेत. त्यांच्या या संघर्षाचा फायदा शिवसेनेला तळागाळातील मते मिळवण्यासाठी होईल, अशी माहिती समोर येत आहे.