मोर्चा निघाला पण माणसं कुठाय?; संजय राठोडांच्या होमपीचवरच मोर्चा रद्द करण्याची नामुष्की

| Updated on: Feb 14, 2021 | 4:25 PM

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून वन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आल्याने राठोड समर्थक आक्रमक झाले आहेत. (Banjara community Cancelled rally to held for support to sanjay rathod)

मोर्चा निघाला पण माणसं कुठाय?; संजय राठोडांच्या होमपीचवरच मोर्चा रद्द करण्याची नामुष्की
Follow us on

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून वन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आल्याने राठोड समर्थक आक्रमक झाले आहेत. राठोड यांचं समर्थन करण्यासाठी आणि विरोधकांचा निषेध नोंदवण्यासाठी बजारा समाजाने मोर्चा काढला. पण मोर्चाला गर्दीच न जमल्याने आयोजकांवर मोर्चा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. (Banjara community Cancelled rally to held for support to sanjay rathod)

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे आज बंजारा समाजाच्यावतीने वन मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे समाजाची बदनामी केली जात आहे. समजाची बदनामी करण्याचा हा डाव आहे, असा आरोप बंजारा समन्वय समितीने काल केला होता. विरोधकांडा हा डावा हाणून पाडण्यासाठी आणि राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी आज पुसद येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला येण्याचं समाजातील लोकांना आवाहनही करण्यात आलं होतं. मात्र, मोर्चाला गर्दी न झाल्यामुळे हा मोर्चा रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली आहे.

पोलीस आले, निघून गेले

याबाबत आयोजकांकडून कारणं दिली जात आहेत. लोकांपर्यंत वेळेत मेसेज पोहोचला नाही. त्यामुळे कार्यकर्ते जमले नाही, असं सांगितलं जात आहे. तर दोन गट पडल्याने कार्यकर्ते जमले नसल्याचंही बोललं जात आहे. मोर्चाच्या इशाऱ्यामुळे पोलिसांनी मोर्चाच्या ठिकाणी जादा कुमक तैनात ठेवली होती. मात्र, मोर्चाला माणसंच न जमल्याने पोलिसांचा बंदोबस्तही हटवण्यात आला आहे. दरम्यान, चारजणांचं शिष्टमंडळ तहसीलदारांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पूजाचे आईवडील मोर्चात येणार होते?

या मोर्चामध्ये पूजा चव्हाणचे आईवडील सहभागी होणार असल्याचंही आयोजकांकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही. आयोजकांनी केवळ चमकोगिरीसाठीच ही पुडी सोडली होती, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

हा खोडसाळपणा

बंजारा समाजाच्या वतीने पुसद येथे काढलेला हा मोर्चा फेल झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आमच्या बंजारा समाजातील कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला नसून तो कुठल्यातरी विरोधी नेत्याचे समाजाला बदनाम करण्याचे कारस्थान असून कुठली मिटिंग न घेता हा मोर्चा काढला. बंजारा समाजाला बदनाम करण्यासाठीच कुणी तरी खोडसाळपणा केल्याचा दावा, बंजारा सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. संजय चव्हाण यांनी केला आहे. (Banjara community Cancelled rally to held for support to sanjay rathod)

 

संबंधित बातम्या:

बंजारा समाज संजय राठोडांच्या पाठी, बदनामी केल्यास रस्त्यावर उतरू; महंतांच्या बैठकीत इशारा

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजाच्या आत्महत्येची CID सारख्या संस्थेकडून चौकशी करा, आजोबांची मागणी

(Banjara community Cancelled rally to held for support to sanjay rathod)