बीडमधून मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडी जप्त, काय आहे प्रकार?
कोर्टाने अनेक वेळा शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यानंतरही शेतकऱ्यांना मोबदला दिली नाही, यामुळे कोर्टाने सर्व प्रकार समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारींची धावती गाडी जप्त करण्यात आली.

Beed Collector Avinash Pathak car seized: राज्यात सध्या बीड जिल्ह्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे लक्ष बीड जिल्ह्याकडे आहे. यामुळेच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्र अजित पवार यांनी घेतली. अजित पवार यांचे पालकत्व असलेल्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडी जप्त करण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकारींची गाडी जप्त होण्याची ही बीडच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
काय आहे प्रकरण
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पासाठी तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. 1998 पासून संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ३२ लाखांची भरपाई देण्याचे आदेश माजलगाव न्यायालयाने दिले. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. नऊ वर्षांपासून पैसे मिळत नसल्याने शेतकरी हातबल झाले होते. शेतकऱ्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली. कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.
आदेशानंतर पैसे दिले नाहीत…
कोर्टाने अनेक वेळा शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यानंतरही शेतकऱ्यांना मोबदला दिली नाही, यामुळे कोर्टाने सर्व प्रकार समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारींची धावती गाडी जप्त करण्यात आली. माजलगाव कोर्टाने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या वाहनाच्या जप्तीच्या आदेश काढल्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयातून ही गाडी जप्त करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना चपराक
बीड जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाने चपराक बसली आहे. आठ दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री म्हणून पहिली बैठक घेतली होती. त्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारींची गाडी जप्त करुन बीड कोर्टात आणण्यात आली. आता न्यायालय काही दिवस हे पैसे जमा होण्याची वाट पाहणार आहे. त्यानंतर पैसे भरले नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकतील, असे वकिलांनी सांगितले. दरम्यान, गाडी जप्त केल्यानंतर गाडीवर अंबर दिवा झाकण्यात आला आहे.
