
परळीमध्ये आयोजित एका प्रचारसभेमध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे. जगतमित्र हे कार्यालय सर्वांसाठी खुलं असायचं, आताही हे कार्यालय सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. काही असेल नसेल, जगतमित्र कार्यालयामधून आपण गोरगरिबांना मदत करायचो, कार्यालय सुरू आहे, गोरगरिबांना मदत सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
धनंजय मुंडे असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस नाही, संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धनंजय मुंडे इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो, जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचं समर्थन कधीच करू नये. अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजूनही अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरे होईल. गोरे गरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं? अस थेट सवालच आता मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत, गुंडागर्दी, भ्रष्टाचार करणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळून, ब्लॅकमेल करून आपला संसार उभा करणे, असे भयंकर पाप कराड करत होता, आणि धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत, नाहीतर तुम्हीसुद्ध धनंजय मुंडे यांच्या पापात खाक होताल, अशा इशाराच आता जरांगे पाटील यांनी दिला आहे.