आखाती देश पाण्यावाचून मरणार! इराण आक्रमक, तेल-गॅसनंतर आता वॉटर प्लांटवर हल्ला
War Update : आखातातील अनेक देशांची लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करणाऱ्या डिसॅलिनेशन प्लांट्सवर अवलंबून आहे. या प्लांट्सवर हल्ले झाले तर पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यात भयानक युद्ध सुरू आहे. इराणवर सतत हल्ले होत आहे. प्रत्युत्तर म्हणून इराण आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करत आहे. या युद्धात आता तेल आणि गॅसनंतर पाणी सर्वात मोठे संकट बनू शकते. कारण आखातातील अनेक देशांची लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करणाऱ्या डिसॅलिनेशन प्लांट्सवर अवलंबून आहे. आता या प्लांट्स क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ला झाल्यास संपूर्ण देशात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. अशातच आता इराणने बहरीनमधील डिसॅलिनेशन प्लांटवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात आखाती देशांना पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.
आखाती देशा पिण्याच्या पाण्यासाठी डिसॅलिनेशन प्लांट्सवर अवलंबून
पर्शियन गल्फच्या किनाऱ्यावर शेकडो डिसॅलिनेशन प्लांट्स उभारलेले आहेत. हे प्लांट्स समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करून ते पिण्यायोग्य बनवतात. जर या प्लांट्सवर हल्ले झाले आणि त्यांचे नुकसान झाले तर अनेक मोठ्या शहरांमध्ये पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होऊ शकते. खाडी देशांच्या पाण्याच्या गरजेचा मोठा भाग याच डिसॅलिनेशन तंत्रज्ञानातून पूर्ण होतो. कुवैतमध्ये सुमारे 90% पिण्याचे पाणी डिसॅलिनेशनमधून येते. ओमानमध्ये हा आकडा जवळपास 86% आहे, तर सौदी अरेबियामध्ये सुमारे 70% पिण्याचे पाणी या पद्धतीने तयार केले जाते. या तंत्रज्ञानाला रिव्हर्स ऑस्मोसिस असे म्हणतात.
खाडी देशांसाठी पाणीच खरा धोका
मध्य पूर्वेच्या बाहेर राहणाऱ्या देशांसाठी मोठा धोका म्हणजे कच्च्या तेलाची पुरवठा साखळी खंडित झाल्याने तेलाची किंमत वाढली आहे. कारण कारण खाडी प्रदेशातून जगातील जवळपास एक-तृतीयांश कच्च्या तेलाची निर्यात केली जाते. त्यामुळे तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते खाडी देशांसाठी खरा धोका हा पाण्याच्या पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले हा असू शकतो कारण यामुळे सामान्य जनतेला पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो.
अनेक प्लांट्सजवळ हल्ले
2 मार्चला इराणच्या हल्ल्यात दुबईतील जेबेल अली बंदरगाहला लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला जगातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन प्लांट्सपैकी एका प्लांटपासून सुमारे 12 मैल अंतरावर झाला होता, ज्यातून दुबईला पिण्याचे पाणी मिळते. तसेच युएईतील फुजैराह F-1 पॉवर अँड वॉटर कॉम्प्लेक्स आणि कुवैतमधील दोहा वेस्ट डिसॅलिनेशन प्लांट जवळही हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हल्ले वाढले तर आखाती देशांना पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो.
