विजेच्या तारांची चोरी करणारी मोठी टोळी सक्रिय, पोलिसांसमोर आव्हान; तारा जातात कुठं?

| Updated on: Aug 18, 2023 | 3:56 PM

विजेच्या तारा चोरणारी ही मोठी टोळी असल्याची शक्यता आहे. विजेच्या तारा कुठं घेऊन जातात?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विजेच्या तारांची चोरी करणारी मोठी टोळी सक्रिय, पोलिसांसमोर आव्हान; तारा जातात कुठं?
Follow us on

भंडारा : भंडारा जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. एमएसईबीचे विजेचे खांब शेतातील विहिरीपर्यंत लावण्यात आले आहेत. यामुळे धानाच्या किंवा इतर पिकांना पाणी दिले जाते. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी या विजेचा वापर केला जातो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी विजेच्या तारांची चोरी होत आहे. देव्हाडी, सिहोरा, तुमसर या भागात विजेच्या तारा तोडून नेल्या जात आहेत. विशेषतः रात्री शेतकरी शेतात जात नाही. अशावेळी ही टोळी येथे कटरने विजेच्या तारा कापते आणि निघून जाते. सकाळी लोकांना माहिती होते. विजेच्या तारा चोरणारी ही मोठी टोळी असल्याची शक्यता आहे. विजेच्या तारा कुठं घेऊन जातात?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

५० एकर शेतजमिनीचे नुकसान

तुमसर वीज वितरण विभागात लोहारा शिवारात विलास गभणे यांच्या शेतातील तारांची चोरी ११ ऑगस्ट झाली. खांबावरील तारा कटरने कापून नेण्यात आल्या. एक खांबही पाडण्यात आला. यामुळे तीन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीजपुरवठा बंद झाला. सुमारे ५० एकर जमिनीला पाणीपुरवठा सध्या करता येत नाही. विलास, छगन गभने, रामू बले आणि इतर यांच्या लोहारा शिवारात शेताचे पाण्याअभावी नुकसान होत आहे.

चोरांना अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

विजेचे कनेक्शन सुरू झाल्यास धानाच्या पिकाला पाणी देता येईल. सध्या धानाला पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्वरित वीजपुरवठा सुरू करून देण्यात यावा, अशी मागणी विलास गभणे यांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्या आहेत. आता या खांबावरील तारा चोरणाऱ्यांचा शोध पोलीस कसा घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विजेच्या तारा चोरणारे कोण?

हे विजेच्या खांबांवरील तारा चोरी करणारे कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विजेच्या तारा चोरून नेल्या जात असल्याने शेतकऱ्यांना शेतात पाणी देता येत नाही. एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता लवकरच या तारा पूर्ववत करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्याचे ते म्हणाले.