कर्करोगाने युवकाचा घरीच मृत्यू, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावरून वाद, गावात तणावपूर्ण परिस्थिती

| Updated on: May 25, 2023 | 3:49 PM

रहदारीच्या रस्त्यावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जातं. पण, वैर किती असावं, यालाही काही मर्यादा आहेत. हेही काही लोकं विसरतात. त्यातून असे वाद होतात.

कर्करोगाने युवकाचा घरीच मृत्यू, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावरून वाद, गावात तणावपूर्ण परिस्थिती
Follow us on

तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : एका युवकाचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. पण, मृतदेह घेऊन जाण्यासाठी गावातल्या सरपंचानेच विरोध केला. त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गावातल्या जमिनीच्या रस्त्याचा वाद कोणत्या स्तराला जाऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण. रहदारीच्या रस्त्यावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जातं. पण, वैर किती असावं, यालाही काही मर्यादा आहेत. हेही काही लोकं विसरतात. त्यातून असे वाद होतात.

रस्त्याचा वाद कोर्टात

मृत्यूनंतर मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील दहेगाव येथे समोर आला आहे. मोहाडी तालुक्यातील दहेगाव येथील बाळकृष्ण देवराम राखडे (वय 32) यांचा कॅन्सरनं उपचार सुरू असताना काल घरीच मृत्यू झाला. त्यांच्या घराला जाण्याचा मार्गाचा विवाद मागील तीन वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

मृतदेह कालपासून घरीच पडून

सरपंच मनोहर राखडे यांनी आता तो मार्ग अडवून धरला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मार्ग नसल्याने कालपासून बाळकृष्ण यांचा मृतदेह त्यांच्या घरीच पडून आहे.

त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यासाठी सरपंचाने मार्ग मोकळा करून दिला नाही तर, मृतदेहावर घरातील अंगणातच अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग त्याच्या कुटुंबावर ओढवला आहे. त्याची तयारी कुटुंबीयांनी सुरू केली आहे.

गावात पोलिसांचा बंदोबस्त

पोलिसांचा मोठा बंदोबस्त या गावात लागला आहे. मोहाडीचे तहसीलदार हेसुद्धा सध्या गावात पोहोचले आहेत. गावाच्या सरपंचाने मृतदेह नेण्यासाठी मार्ग देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तर, मार्ग न मिळाल्यास घरीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गावात तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.