आमचे कौटुंबिक संबंध, राणे साहेबांना… राणेंना भोवळ येताच ठाकरेंचा आमदार भावूक, म्हणाला त्यांच्या प्रकृतीची…

चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणे यांना भोवळ आल्यानंतर भास्कर जाधव यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणातील कटुता आणि वैयक्तिक जिव्हाळा यावर त्यांनी व्यक्त केलेली ही खास प्रतिक्रिया

आमचे कौटुंबिक संबंध, राणे साहेबांना... राणेंना भोवळ येताच ठाकरेंचा आमदार भावूक, म्हणाला त्यांच्या प्रकृतीची...
narayan rane
| Updated on: Jan 07, 2026 | 12:48 PM

राजकारणात काम करताना अनेकदा मतभेद होतात, काही गोष्टींमुळे कटुता येते, मात्र मनात कुठेतरी जिव्हाळा कायम असतो, असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. चिपळूणमधील एका कार्यक्रमात नारायण राणे यांची तब्ब्येत बिघडली होती. त्यांना अचानक भोवळ आली. या पार्श्वभूमीवर भास्कaर जाधव यांनी राजकारण्यांच्या धावपळीच्या जीवनावर आणि नारायण राणेंशी असलेल्या जुन्या संबंधांवर भाष्य केले.

काही दिवसांपूर्वी चिपळूण येथील एका जाहीर कार्यक्रमात नारायण राणे भाषण करण्यासाठी उभे राहिले होते. यावेळी त्यांची तब्येत काहीशी ढासळलेली दिसत होती आणि भाषणादरम्यान त्यांना अचानक भोवळ आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले. मात्र, शरीराने साथ दिली नसली तरी राणे यांचा उत्साह मात्र कायम होता. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या, पण भास्कर जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

राजकारणाची कोणतीही पत किंवा अनुभव नसताना अनेक जण राजकारण्यांना उपदेशाचे डोस पाजत असतात. पण त्यांना हे माहित नसते की, एका लोकप्रतिनिधीला २४ तास काम करावे लागते. राजकारणी माणसाला ना सुट्टी असते, ना सण-उत्सव. सतत लोकांच्या गराड्यात राहून स्वतःला झोकून द्यावे लागते. या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. ९९ टक्के राजकारण्यांना वेळेवर जेवणही मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या शरीराची मोठी हाळसांड होते, असे भास्कर जाधव म्हणाले.

जुने ऋणानुबंध पूर्णपणे पुसले जात नाहीत

मी आणि नारायण राणे यांनी अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम केले आहे, ही वस्तुस्थिती आहे. आमचे केवळ राजकीयच नव्हे, तर कौटुंबिक संबंध देखील होते. माझं बेधडक वागणं, स्पष्टपणे बोलणं आणि आक्रमक बाणा राणे साहेबांना नेहमीच आवडत आला आहे. आमच्या वयात केवळ ५ ते ६ वर्षांचे अंतर आहे. राजकीय प्रवासात काही वळणांवर आमच्यात अंतर पडले, बोलण्यात कटुता आली, पण जुने ऋणानुबंध पूर्णपणे पुसले जात नाहीत, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.

तुमच्यामुळे संबंध बिघडले

यापूर्वी नारायण राणे यांनी आपल्या मुलाला उद्देशून तुमच्यामुळे आमच्यातील संबंध बिघडले आहेत, असे म्हटले होते. ज्यावर निलेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेला हा जिव्हाळा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us