
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 15 जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी आहे. दरम्यान मंगळवारी उमदेवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, तर आज उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाणनी होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेवढा एकच निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थान यांनी चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या संस्थानाने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती.
त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेऊन, ती श्री. अंबादेवी संस्थानास विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – २ म्हणून मिळणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे, असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही जमीन आता श्री अंबादेवी संस्थान यांना देण्यात येणार आहे.