Khavdya Dongar Case: मोठी अपडेट! कुणाल चांदगुडेच्या शेरूचं आता काय होणार? कुटुंबियांनी घेतला निर्णय

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगर येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. येथे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आता त्यांच्या पाळीव श्वानाचे पुढे काय होणार? याबाबत अपडेट समोर आली आहे.

Khavdya Dongar Case: मोठी अपडेट! कुणाल चांदगुडेच्या शेरूचं आता काय होणार? कुटुंबियांनी घेतला निर्णय
Khavdya Dongar Case
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 8:19 AM

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला. आयफोन वाचवण्याच्या प्रयत्नातून ५० मिनिटात चांदगुडे कुटुंबातील आई, वडील आणि १९ वर्षीय मुलाचा जीव गेला. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, त्यांचा पाळीव श्वान मालकाविना एकटाच दुःखात आहे. तो घरात एकटाच भुंकत होता. आता त्याचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

शेरूचं पुढे काय होणार?

चांदगुडे कुटुंबाचा अंत झाल्यानंतर पाळीव श्वान अगदी एकटा पडला. तो घराच्या खिडकीतून बाहेर पाहतो आणि अधूनमधून आर्तपणे भुंकत होता. कुणाल चांदगुडे गेल्या सहा वर्षांपासून या पाळीव श्वानाचा सांभाळ करत होता. आता शेरू सतत त्याच्या मालकाच्या येण्याची वाट पाहात आहे. पण त्याचा सांभाळ करणारे या जगात नाहीत. त्यामुळे प्राणिमित्र शैलेश माने यांनी चांदगुडे कुटुंबीयांच्या शेरू कुत्र्याचे पालकत्व स्वीकारले आहे. शैलेश माने यांच्याकडे यापूर्वीच अपघातग्रस्त १० ते १२ कुत्रे आहेत. चांदगुडे कुटुंबीयांच्या शेरूचेही आता ते संगोपन करणार आहेत. माने यांनी शेरूसोबत वेळ घालवला असून, शेरू त्यांच्यासोबत खेळला आणि जेवणही केले, अशी माहिती त्यांनी दिली.

तिघांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शेरू तीन दिवस घरात बंद होता. काल पेट लव्हर असोसिएशनने शेरूची सुटका केली होती. त्यानंतर प्राणिमित्रांनी पुढाकार घेत शेरूला नवीन घर दिले. शैलेश माने यांनी सांगितले की, शेरू सध्या सुरक्षित आहे आणि त्याची काळजी घेतली जात आहे. मालकाविना एकटे राहिलेल्या या श्वानाला आता प्रेमळ वातावरण मिळाले आहे. या दुःखद घटनेनंतर शेरूच्या भवितव्याबाबत अनेकांना चिंता होती. मात्र प्राणिमित्रांच्या हस्तक्षेपाने शेरूला नवीन आयुष्य मिळाले आहे. चांदगुडे कुटुंबीयांच्या या पाळीव मित्राला आता चांगले संगोपन मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादानंतर कुणाल रागाच्या भरात तिसगाव येथील खवड्या डोंगरावर आला. त्याच्या मनात टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार होता. कुणाल डोंगरावर गेल्याची माहिती मिळताच त्याचे आई-वडीलही आपल्या मुलाला काही बरे-वाईट होऊ नये म्हणून त्याच्या मागे धावत डोंगरावर पोहोचले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावकरी, सरपंच, पोलीस अधिकारी आणि बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. कुणालशी संवाद साधून त्याला समजावण्याचा आणि त्याला सुरक्षितपणे खाली आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. बचाव पथकाने खबरदारी म्हणून खाली सुरक्षा जाळीही लावली होती. मात्र कुणाल सतत आपली जागा बदलत असल्याने परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us