भाजपात पुन्हा ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘बाहेरचे’? मोदी कॅबिनेट विस्तारावर महाराष्ट्रात मोठी चर्चा, काय घडलंय?

| Updated on: Jul 08, 2021 | 1:01 PM

राणेंनी शिवसेना सोडली ती मंत्रीपदाच्या मुद्यावर. नंतर काँग्रेस सोडली तीही मुख्यमंत्रीपदाच्याच मुद्यावर. आता जर भाजपानं मंत्री केलं नसतं तर राणे पक्षातच राहीले असते का अशीही चर्चा रंगलीय. शिवसेनेचे नेते त्यावर बोटही ठेवतायत.

भाजपात पुन्हा निष्ठावंत विरुद्ध बाहेरचे? मोदी कॅबिनेट विस्तारावर महाराष्ट्रात मोठी चर्चा, काय घडलंय?
maharashtra leaders in modi ministry
Follow us on

मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलाय. यात महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिमंडळ आलेले आहेत.
ह्या चारमध्ये नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा समावेश आहे.
पण भाजपानं ज्या चार जणांना संधी दिलीय, त्यातल्या तीन नावांवर आताच सोशल मीडियावर
चांगलीच चर्चा रंगताना दिसतेय. भाजपात निष्ठावंतांना डावलून जे बाहेरुन काही वर्षात पक्षात
आले त्यांना स्थान दिल्याचं म्हणणं आहे. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना
डिवचताना दिसतायत.

कोण कुठल्या पक्षातून आले?
नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार, आणि कपिल पाटील हे चौघे जण केंद्रात मंत्री झालेत.
पैकी राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत तर कराड, पवार, पाटील हे राज्यमंत्री. ह्या नावाचं आणखी एक
वैशिष्ट्य म्हणजे चार पैकी तीन नेते हे गेल्या दोन एक वर्षात भाजपात आलेले आहेत. फक्त
भागवत कराड असे एकमेव आहेत, ते पहिल्यापासून भाजपात आहेत. ते निष्ठावंतांमध्ये मोडतात.

राणेंचा राजकीय प्रवास?
राणेंचं मंत्रीपदासाठी नाव आलं त्याचवेळेस त्यांच्या पक्षबदलाबाबत चर्चा सुरु झाली. राणे हे
शिवसेनेत होते. सेनेनं त्यांना मुख्यमंत्री केलं. पण बाळासाहेबांच्या हयातीतच त्यांना शिवसेना
सोडली. उद्धव ठाकरेवर टीका करत राहीले. नंतर ते विलासरावांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये
केले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण अशोकरावांना काँग्रेसनं संधी दिली. राणेंनी देशमुख
चव्हाणांसह काँग्रेस हायकमांडवर टीका केली. नंतर काँग्रेसही सोडली. भाजपचे सहयोगी
नेते म्हणून काम करत राहीले. नंतर ते भाजपच्याच कोट्यातून राज्यसभेवर गेले. नंतर
रितसर भाजपात दाखल झाले. आता ते भाजपाकडून मंत्री झाले. पण भाजपात वर्षानुवर्ष
काम केलेल्यांना डावलून मंत्रिपद दिल्यानं सोशल मीडियावर ‘निष्ठावंतांनो सतरंज्या उचला’ची
जोरदार चर्चा सुरु झालीय.

भारती पवार, कपिल पाटीलही ‘बाहेरचे’ !
भारती पवार ह्या दिंडोशीच्या खासदार. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्या राष्ट्रवादीतून
भाजपात दाखल झाल्या. तर कपिल पाटील हे भिवंडीचे खासदार. तेही राष्ट्रवादीतून भाजपात
आले. 2014 ला त्यांचा भाजपा प्रवेश झाला. कपिल पाटील हे ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
होते. नंतर ते भाजपात आले. भिवंडी लोकसभेचं तिकिट मिळालं. निवडुण आले. भारती
पवार ह्याही राष्ट्रवादीत होत्या. त्यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात उडी
घेतली आणि अवघ्या दोन वर्षात खासदार, मंत्रीही झाल्या.

राणेंनी शिवसेना सोडली ती मंत्रीपदाच्या मुद्यावर. नंतर काँग्रेस सोडली तीही मुख्यमंत्रीपदाच्याच
मुद्यावर. आता जर भाजपानं मंत्री केलं नसतं तर राणे पक्षातच राहीले असते का अशीही
चर्चा रंगलीय. शिवसेनेचे नेते त्यावर बोटही ठेवतायत. कपिल पाटील, भारती पवार यांच्याबद्दल
मात्र तशी चर्चा नाही. पण पक्षातल्या इतर निष्ठावंत ओबीसी नेत्यांना डावलून या दोन्हींना
संधी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.