BJP Ravindra Chavan : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी कायम राहिले असते तर आज मराठवाड्याचा पाणी प्रश्न..रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी टीव्ही 9 मराठीशी त्यांनी संवाद साधला. गणरायाकडे काय मागितलं? या प्रश्नावर त्यांनी “गणरायाच्या चरणी माझ्यासारखा प्रत्येक गणेशभक्त हेच आवाहन करतो की, देशातील प्रत्येक नागरिकाला चांगलं आरोग्य मिळो. हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो” मराठवाडा, विदर्भ येथे पाऊस कमी झालाय. बळीराजा चिंतेत आहे या मुद्यावरही ते बोलले. “खरंतर आपल्याला माहित आहे की, वातावरण बदलामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असणारं वातावरण कमी-जास्त स्वरुपात पडणारा पाऊस देशभरात परिस्थिती अशीच आहे. देवेंद्रजी या सगळ्याकडे विशेष लक्ष ठेऊन असतात” असं ते म्हणाले. “पाच ऑक्टोंबर नंतर सर्वे वैगेर केल्यानंतर दुष्काळ जाहीर करावा लागतो. या परिस्थिती सरकार ठामपणे 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे” असं रविंद्र चव्हाण म्हणाले.
“या सगळ्यावर कायमस्वरुपी काय तोडगा काढता येईल या दृष्टीकोनातून देवेंद्रजी विशेष प्रयत्न करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या पाण्यामुळे ओला दुष्काळ पडतो. सध्या सुक्या दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाडा ग्रीड करण्याचा प्रयत्न आहे. कायमस्वरुपी तोडगा निघेल” असं रवींद्र चव्हाण म्हणाले. “ते जो विचार करतायत, ते सर्व प्रकल्प मुदतीमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे. 2019 साली जो प्रकार घडला, जर त्यावेळी देवेंद्र फडणवीस कायम राहिले असते तर आज जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती मराठवाडा ग्रीड असे अनेक प्रकल्प शेतकरी, सिंचनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे होते. कोल्हापुर पुराच्या पाण्यामुळे जे प्रश्न आहेत, त्यावर मार्ग निघाला असता” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
आरक्षणाच्या मागणीवर काय म्हणाले?
आरक्षण तसंच विविध मागण्यांसाठी आंदोलनं सुरु आहेत, त्यावर रवींद्र चव्हाण म्हणाले की, “खरंतर पार्टीचा अध्यक्ष म्हणून सरकार म्हणून महायुतीचं सरकार आहे, सकारात्मक दृष्टीकोनातून प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहोत” “विकसित महाराष्ट्र, विकसित भारत म्हणून काय करता येईल त्यासाठी प्रयत्न करत आहोत. आंदोलनं होतात, वेगवेगळ्या मागण्या समोर येतात. लोकशाही मार्गाने जी आंदोलनं होत आहेत, त्या सर्वांशी महायुती सरकार चर्चा करत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोणत्याही घटकाला त्रास होणार नाही, दुसरा घटक दूर होणार नाही. असा समतोल राखून कायद्याच्या चौकटीत राहून जे काही करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न करत आहोत” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.