सलाम नको नमस्ते वापरा, IPL च्या त्या स्लोगनवर भाजपा युवा मोर्चाचा आक्षेप; काय होणार?
भाजप युवा मोर्चाने सलाम मुंबई या घोषणेवर आक्षेप घेत सलाम मुंबई ऐवजी नमस्ते मुंबई किंवा नमस्कार मुंबई असा वापर करण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियमच्या स्क्रीनवर झळकणाऱ्या सलाम मुंबई या स्लोगनवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप युवा मोर्चाने या घोषणेवर आक्षेप घेत सलाम मुंबई ऐवजी नमस्ते मुंबई किंवा नमस्कार मुंबई असा वापर करण्याची मागणी केली आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे अधिकृत निवेदन दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सलाम मुंबई हे स्लोगन बदलण्याची मागणी
मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या निवेदनात दीपक सिंह यांनी म्हटले की, ‘सलाम मुंबई’ ही मुंबईची पारंपरिक संस्कृती आणि ओळख दर्शवणारी घोषणा नाही. मुंबई आणि महाराष्ट्राची संस्कृती, भाषा आणि परंपरा लक्षात घेता नमस्ते मुंबई किंवा नमस्कार मुंबई यांसारख्या घोषणांचा वापर व्हायला हवा. त्यांनी असेही स्पष्ट केले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून येथील सांस्कृतिक ओळख जपणे गरजेचे आहे.
काय म्हणाले अजिंक्य नाईक?
यासंदर्भात भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनात महाराष्ट्रात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांदरम्यान जय महाराष्ट्र हा स्लोगनही स्क्रीनवर झळकवण्याची मागणी करण्यात आली आहे. आता एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबईतील प्रेक्षकांच्या भावना आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या मागणीमुळे सोशल मीडियावरही चर्चा रंगली असून काही जणांनी भाजप युवा मोर्चाच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. आगामी आयपीएल सामन्यांमध्ये एमसीए कोणता निर्णय घेते, याकडे आता क्रिकेटप्रेमींसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. कारण याआधीही राज्यात मराठी विरूद्ध हिंदी असा वाद पेटला होता. तसेच मुंबईतील अनेक इंग्रजी लोकल स्थानकांच्या नावातही बदल करण्यात आला होता. अनेक स्टेशन्सचे इंग्रजी नाव बदलून मराठी नाव करण्यात आले होते. आता आयपीएल सामन्यांवेळी वापरले जाणारे सलाम मुंबई हे स्लोगनही बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.