राज्यात आणखी एक उष्माघाताचा बळी? बुलढाण्यात एसटी वाहकाचा मृत्यू

बुलढाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटीच्या वाहकाचा मृत्यू झाला आहे. या वाहकाचा मृत्यू हा उष्माघातानं झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यात आणखी एक उष्माघाताचा बळी? बुलढाण्यात एसटी वाहकाचा मृत्यू
Maharashtra Heatwave
| Updated on: Apr 21, 2025 | 9:29 PM

राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, जिल्ह्यात पारा 45. 6 अंश  सेल्सिअसवर पोहोचला आहे. तर ब्रम्हपुरीमध्ये 45 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यावर देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

बुलढाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटीच्या वाहकाचा मृत्यू झाला आहे. या वाहकाचा मृत्यू हा उष्माघातानं झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. संजय भगवान मोरे वय 30 वर्ष असं या मृत वाहकांचं नाव आहे. ते चिखली डेपोमध्ये कार्यरत होते. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संजय भगवान मोरे वय 30 हे चिखली डेपोमध्ये कार्यरत होते. ते रविवारी बुऱ्हाणपूर येथून बस घेऊन आले होते. त्यांना पुन्हा एकदा ड्युटीवर जायचे होते. मात्र त्याचपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

विदर्भात उष्णतेची लाट 

विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 41 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये देखील प्रचंड उकडा जाणवत आहे. आणखी काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान यापूर्वी देखील अशीच एक घटना घडली आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये बसची वाट पाहात उभ्या असलेल्या एका प्रवाशाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.  अमोल दामोदर बावस्कर असे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या या 25 वर्षीय तरुणाचं नाव होतं, जिल्ह्यातील सोयगावमध्ये ही घटना घडली होती. उष्णता वाढत असल्यामुळे पाणीसाठा देखील अटला असून, राज्यातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.