शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करणं विजय वडेट्टीवार यांना भोवलं, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने दखल घेतली जात आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांच्याही विरोधात दुसऱ्या एका वेगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहीद हेमंत करकरे यांच्या शरिरात घुसलेली गोळी ही कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. या प्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसने भाजपच्या जाहिरातीबाबत तक्रार केली होती. त्यावरुन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठाणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. “तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे? भारतात की पाकिस्तानात?” अशा प्रकारची जाहिरात महायुतीकडून देण्यात आली होती. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“तक्रार ही निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला पाठवली. आम्ही फक्त चौकशी करायला सांगितली. स्थानिक पातळीवर चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचाच अर्थ जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कारवाई ही झाली आहे. केस फाईल करणारे निवडणूक आयोगाशी संबंधित अधिकारी असतील. निवडणूक यंत्रणेमार्फत केस फाईल करण्यात आली आहे”, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बारामतीत 4 गुन्हे दाखल
“बारामतीमध्ये एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिता भंगची कारवाई बाबत जी तक्रार आहे त्याप्रकरणी आम्ही कारवाई करतो. बारामतीमध्ये माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. काही गुन्हे दाखल झाले आहेत. माहिती घेतल्यानंतर एफआयआर दाखल करून नंतर आरोपपत्र दाखल केला जातो. बारामतीमध्ये आलेल्या तक्रारीची नंतर दखल घेऊन कारवाई केली गेली आहे”, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिली.
“माझ्या माहितीप्रमाणे बारामतीमध्ये एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. एकूण राज्यात 54 तक्रारी आल्या आहेत. 24 गुन्ह्यांबाबत आम्ही दाखल घेऊन कारवाई केली आहे. त्यात 4 बारामतीबाबत आहेत. काही ठिकाणी तक्रारी नंतर ती तक्रार चुकीची असल्याची देखील माहिती समोर येतात. त्यामुळे माहिती घेऊन सखोल चौकशी करावी लागते. म्हणून मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांनी ती बैठक घेतली आणि निर्देश दिले आहेत’, अशी माहिती अधिकारीने पत्रकार परिषदेत दिली.