‘फटाके एवढे वाजवा की त्याचा आवाज बांद्रापर्यंत पोहोचवा’, रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारसभेत बोलत होते. रोजच्या सभा करून माझा आवाज कमी झालाय, तुमच्या आशीर्वादाने वीस तारखेपर्यंत आवाज चालत राहील. कोकणभूमी फार पवित्र आहे, बाळासाहेबांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम उभे आहेत. योगेश कदम यांचा विजय निश्चित आहे. 23 तारखेला गुलाल उधळायचा दिवाळी साजरी करायची, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, दापोलीमध्ये विकासाची गंगा आणायची आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांची विकास कामं आपल्या सरकारनं इथे केली आहेत. यापूर्वीचे मुख्यमंत्री भेटतच नव्हते, तर निधी मिळणार कुठून? फटाके एवढे वाजवा की त्याचा आवाज बांद्रापर्यंत पोहोचायला पाहिजे . उद्धव ठाकरे मला म्हणालेत दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा, महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकरी आहे, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
कोकण आणि शिवसेनेला कोणी वेगळं करू शकत नाही, बाहेरून काटेरी पण आतून गोड अशी कोकणातली माणसं आहेत. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू, हे सरकार देणार आहे, घेणार नाही. आमची नियत साफ आहे. मतदान झाल्यानंतर लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबरचे पैसे देखील तुमच्या खात्यात येतील. कुणाला धमक्या देतायेत? आम्ही घाबरत नाही, तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं. त्यामुळे टांगा पलटी घोडे पसार.
शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं, काँग्रेसच्या मांडीवर शिवसेना जाऊन बसली, लोकांशी तुम्ही विश्वासघात केला, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us