Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार, आता जंतर मंतरपेक्षाही मोठं आंदोलन
येत्या पाच सप्टेंबरला जे आंदोलन होणार आहे, ते आंदोलन या आधी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठं असेल, दुर्दैवाने हे आंदोलन आम्हाला करावं लागत आहे, असं यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

सीजेपीच्या वतीने दिल्लीमधील जंतर -मंतरवर मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याकडून आणखी एका आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पाच सप्टेंबर रोजी एक शांततापूर्ण मोर्चा निघणार आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर जे आंदोलन झालं होतं, त्यानंतर 25 जुलै रोजी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती, ती आश्वासनं अजूनही पूर्ण झालेली नाहीयेत, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना जी आश्वासनं देण्यात आली होती, ती अजूनही पूर्ण झालेली नाहीयेत. सरकार म्हणत आहे की, कोर्टामुळे आम्हाला ते करता येत नाही, पण कोर्ट म्हणतं आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त लिस्ट द्या, मात्र सरकार यादी देत नाही. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत. त्यामुळे आता जंतर -मंतरवर जे आंदोलन झालं, त्याहीपेक्षा मोठं आंदोलन दिल्लीमध्ये होणार आहे, असा इशारा यावेळी अभिजीत दिपके यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची आज वेळ का आली? जेव्हा एखादा व्यक्ती आंदोलन करतो तेव्हा त्याच्या समोरचं ते लास्ट ऑप्शन असतं, तिथं सरकार त्यांना मजबूर करतं. जर सरकारने समाजाच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं असतं आणि रोजगाराच्या संधी दिली असती तर मनोज जरांगे यांना आंदोलन करावं लागलं असता का? असा सवाल यावेळी दिपके यांनी उपस्थित केला आहे.
हे सरकारचं अपयश आहे, आज राज्यात सगळेच आंदोलन करत आहेत. मराठा समाजात देखील शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्यांना रोजगाराच्या संधी सुद्धा मिळत नाहीत. हे सरकारचं अपयश आहे की त्यांना आंदोलन करावं लागतं, आम्हाला तरी आंदोलन करायला कुठे आवडतं, परंतु आम्हाला तब्बल 35 दिवस सरकारने बसून ठेवलं, असंही यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.