आता तो माझं ऐकणार नाही, कॉकरोच पार्टीनंतर अभिजित दीपकेच्या वडिलांच्या मनात भीती; सगळं सांगितलं!
भगवान दीपके यांनी राजकारणाविषयीही त्यांची भूमिका मांडली. राजकारणाविषयी मला थोडी भीती वाटते. त्याने राजकारणात जायला नको, अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. आता तो माझे ऐकणार नाही, असे ते म्हणाले.

Cockroach Janta Party : सध्या देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी‘ या सोशल मीडिया मुव्हमेंटची जोरदार चर्चा सुरू आहे. रोजगार आणि नोकरी न मिळालेल्या तरुणांचा सरन्यायाधीशांनी कॉकरोच म्हणून उल्लेख केल्याने छत्रपती संभाजीनगरातील अभिजित दीपके नावाच्या तरुणीने कॉकरोच जनता पार्टी सुरू केली आहे. ही पार्टी सध्या नोंदणीकृत नसली तरीही अभिजितने आपल्या पक्षाचा जाहीरनामादेखील जारी केला आहे. अभिजितच्या या कॉकरोच जनता पार्टीला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्रामवर भाजपा, काँग्रेस या पक्षांपेक्षाही जास्त फॉलोअर्स झाले आहेत. दरम्यान, जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या कॉकरोच जनता पार्टीचा निर्माता अभिजित दीपके हादेखील चर्चेत आला आहे. तो मुळचा छत्रपती संभाजीनगरचा राहिवासी आहे. अभिजितबद्दल आता त्याचे वडील भगवान दीपके यांनी बरीच माहिती दिली आहे. अभिजितला गरीब माणसांबद्दल दया आहे, कोरोनाच्या काळात त्याने लोकांना खूप मदत केली असे भगवान दीपके यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी माझ्या मुलाने राजकारणात जाऊ नये, अशी इच्छाही व्यक्त केली.
मला वाटलं की तो यूट्यूवर काही सुरू करेल
टीव्ही 9 मराठीने अभिजित दीपकेचे वडील भगवान दीपके यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बरीच माहिती दिली. तो असं काही करेल म्हणून मला याची कल्पना नव्हती. 17 जूनरोजी मला समजलं तो डिजिटल मीडियावर पक्ष काढतो आहे म्हणून. मला वाटलं की तो यूट्यूवर काही सुरू करेल. पण त्याला एवढे सारे फॉलोअर्स भेटतील असं मला वाटलं नव्हतं, अशी भावना भगवान दीपके यांनी व्यक्त केली.
त्याने कोरोनाकाळात खूप मदत केली
भगवान दीपके यांनी राजकारणाविषयीही त्यांची भूमिका मांडली. राजकारणाविषयी मला थोडी भीती वाटते. त्याने राजकारणात जायला नको, अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. आता तो माझे ऐकणार नाही. सध्या राजकारणात कुरघोडी, असे प्रकार घडत आहेत. म्हणून मला राजकारण नको वाटतं. अभिजित आम आदमी पार्टीसाठी काम करत होता. परंतु तो सक्रिय राजकारणात नव्हता. सरन्यायाधीशांनी कॉकरोच केलेला उल्लेख त्याला आवडला नसावा. त्याला सामान्य माणसांबद्दल दया होती. गावाकडे असताना त्याचे आदिवासी समाजाचे मित्र होते. ते मित्र पावसात भिजून यायचे. त्याच स्थितीत तो त्यांना मिठी मारायचा. त्याने कोरोनाच्या काळात मला किंवा माझ्या पत्नीला न विचारताच त्याने लोकांना तांदूळ देऊन टाकले होते, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या. मला वाटलं की तो एमपीएससी करेल. यूपीएससी करेल. चांगल्या मार्काने पास होईल आणि क्लास वनचा जॉब करेल. आता नातेवाईक मित्रपरिवार सगळे म्हणत आहेत अभिजीत बघ तुझा मुलगा खूप प्रसिद्ध झाला आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.