बागेश्वर बाबांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; संभाजीराजेंचा संताप, म्हणाले अशा भोंदू बाबांना…

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता चांगलंच वातावरण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी यावरून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बागेश्वर बाबांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; संभाजीराजेंचा संताप, म्हणाले अशा भोंदू बाबांना...
Sambhaji Raje Chhatrapati
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 9:12 PM

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता चांगलंच वातावरण तापलं आहे.‘छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपला मुकुट काढला व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाही. तुम्ही एक दया करा की, हा मुकुट तुम्ही आता सांभाळा, हे राज्य सांभाळा.’ असं वादग्रस्त विधान बागेश्वर बाबा यांनी केलं होतं. यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी बागेश्वर बाबा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात, राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केले पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी.’ असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

 

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील बागेश्वर बाबा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘विकृत धीरेंद्र शास्त्रीने (बागेश्वर बाबा) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच विकृताचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला. हा महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा अपमानच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते आधुनिक काळातील गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणी आणि लेखणीने समृद्ध केलेल्या संत परंपरेशी या ढोंगी बागेश्वर बाबाला जोडताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.’ असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us