मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर, SRPF बंदोबस्ताची तयारी, बीड अन् धारशीवमध्ये संचारबंदी

Maratha Reservation Protest | मराठा आंदोलनास राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. यामुळे बीड आणि धारशिवमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात गरज पडल्यास SRPF बंदोबस्त लावण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांनी अहवाल दिला आहे.

मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर, SRPF बंदोबस्ताची तयारी, बीड अन् धारशीवमध्ये संचारबंदी
Maratha Reservation mla home attack
| Updated on: Oct 31, 2023 | 8:29 AM

मुंबई | 31 ऑक्टोंबर 2023 : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशी सुरु आहे. मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. सोमवारी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक झाली. क्षीरसागर यांचे घर पेटवून दिले. त्यानंतर प्रशांत बंब यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. यामुळे बीड आणि धारशिवमध्ये बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याठिकाणी एसआरपीएफचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतला. ज्या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी संचार बंदी आणि कलम १४४ चा वापर करण्याबाबत चर्चा या बैठकीत झाली.

कर्नाटक आगाराच्या बसला आग

कर्नाटक आगाराच्या बसला अज्ञात इसमाने आग लावली. बसमध्ये ३९ प्रवाशी होते. त्या सर्व प्रवाशांना आणि चालक, वाहकास खाली उतरवून बसला आग लावण्यात आली. ही घटना बीडमधील उमरगा येथे घडली. राज्यातील परिस्थितीमुळे एसटी महामंडळाने मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस रद्द केल्या आहेत.

बीडमध्ये srpf चा बंदोबस्त

बीडमध्ये आजपासून srpf पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. मुख्यमंत्री यांनी मराठवाडातील परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून घेतला. गरज पडल्यास संपूर्ण मराठवाड्यात srpf आणि इतर बंदोबस्त लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत आजपासून संचारबंदीचे आदेश दिले आहे. यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा पोलिस महासंचालकांकडून घेतला. राज्यात ज्या ज्या ठिकाणी उद्रेक झाला आहे, त्याठिकाणी तसेच ज्या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी संचारबंदी आणि कलम १४४ चा वापर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यावर सरकारचा भर असणार आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट आणि आंदोलनाबाबत आक्रमक पोस्ट केल्या जात आहे. यावर सायबर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्याबाबत चर्चा झाली.