शिक्षण, आरोग्य अन् रोजगार…; राजकीय रणनीतीकारांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांचं आदिवासी समाजाबाबत महत्वाचं वक्तव्य
sunetra pawar : सुनेत्रा पवार यांनी आदिवासी समाजाबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आदिवासी समाजाचा इतिहास हा भारताचा स्वाभिमान असल्याचेही त्यांनी अधोरेखित केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आदिवासी बांधवांशी बोलताना सूचक वक्तव्य केलं आहे. जग ‘क्लायमेंट चेंज’, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि स्टटेनेबल डेव्हलपमेंट’ या सारख्या संकल्पनावर चर्चा करत आहे. तरी आदिवासी समाज शेकडो वर्षांपासून आचरणात आणत आलाय. त्यामुळे आदिवासी समाज हा केवळ विकासाचा लाभार्थी नसून विकासाला दिशा देणारा समाज आहे, असं सुनेत्रा पवार यांनी अधोरेखित केलं. अनेक पायाभूत सुविधा गावागावात पोहोचणार असल्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात बैठक झाली होती.
मुंबईत आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, लोककला, हस्तकला, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीचा परिचय करून देणाऱ्या ‘आदिवासी संस्कृती उत्सव – वनरंग २०२६’ या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यक्रमात उपस्थित आदिवासी बांधवांशी संवाद साधला.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘आदिवासी संस्कृती ही केवळ परंपरा नाही. तर निसर्गाशी सुसंवाद साधणारी, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आणि शाश्वत विकासाचा मार्ग दाखवणारी जीवनपद्धती आहे. त्याचबरोबर समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन आणि व्यापक संवर्धन ही काळाची गरज आहे. राज्य शासन शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण तसेच रस्ता, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे’.
‘डिजिटल युगातही बोलीभाषा, लोककला, लोकसंगीत, हस्तकलेचा वारसा जिवंत ठेवायला पाहिजे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, क्रांतीवीर रोघाजी भांगरे यांचं देशासाठी मोठं योगदान आहे. आदिवासी समाजाचा इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, ‘महायुती सरकारनं आदिवासी विकास आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिलंय. अजित पवारांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम केलं. आदिवासी समाजाला कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिलाय. सरकार आणि पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आक्षमशांचं आधुनिकीकरण, ई-लर्निंग सुविधा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी विशेष योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारखे उपक्रम राबवले जाताहेत’. त्यानंतर नाशिकच्या दिलीप गावित याने ग्लास्को येथील क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं, असं म्हणत त्याचं विशेष अभिनंदन केलं.
