कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करू नये, पंढरपूर सकल मराठा समाजाचा इशारा

येत्या कार्तिकी एकादशीला 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूराला विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या शासकीय पूजेला उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये असा इशारा पंढरपूर सकल मराठा समाजाने दिला आहे.

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करू नये, पंढरपूर सकल मराठा समाजाचा इशारा
kartiki ekadashi mahapuja
Image Credit source: socialmedia
| Updated on: Nov 03, 2023 | 10:47 PM

पंढरपूर | 3 नोव्हेंबर 2023 : कार्तिकी एकादशीला येत्या 23 नोव्हेंबरला पंढरपूरला होणारी विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ नये, ही पूजा सामान्य वारकऱ्याच्या हस्ते करावी अशी मागणी पंढरपूरातील सकल मराठा समाजाने केली आहे. जर ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली तर त्यांना काळे फासण्यात येईल असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचेही पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने म्हटले आहे.

येत्या कार्तिकी एकादशीला 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूराला विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या शासकीय पूजेला उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये, विठ्ठलाच्या पूजेचा मान सामान्य वारकऱ्याला देण्यात यावा, जर उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला आले तर त्यांना काळे फासण्यात येईल असाही इशारा पंढरपूरच्या सकल मराठा समाजाने दिला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपला हा निर्णय मागे घेण्यात येणार नसल्याचे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय…

सरकारच्या शिष्ठमंडळाने आरक्षणासाठी थोडा वेळ मागितल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी काल नऊ दिवसानंतर आपले आमरण उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय महाराष्ट्रात सर्वत्र साखळी उपोषण सुरुच रहाणार आहे. पंढरपूरच्या सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरु केले आहे. आम्ही यापूर्वीच जाहीर केले आहे. कलेक्टर किंवा मंदिर समितीला यापूर्वीच निवेदन देऊन कळविले आहे. विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते असते. ती पूजा सामान्य वारकऱ्याच्या हस्ते करावी. जर शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली तर मराठा समाज त्याला काळे फासण्यात येईल. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार तोपर्यंत हा निर्णय मागे घेण्यात येणार नसल्याचे किरण घाटगे यांनी म्हटले आहे.