अजित पवार गटाला मोठा धक्का, केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही, खुद्द फडणवीसांकडून गौप्यस्फोट

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती. त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो. पण त्यांचीदेखील अडचण होती", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अजित पवार गटाला मोठा धक्का, केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही, खुद्द फडणवीसांकडून गौप्यस्फोट
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
Chetan Patil | Updated on: Jun 09, 2024 | 3:55 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत किंवा मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावं यासाठी राष्ट्रवादीच्याबाबत पडद्यामागे काय-काय घडलं? याचं सविस्तर विश्लेषणच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेतून अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या एकही जागा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्यावतीने तथा सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. मात्र, आपल्यालादेखील कल्पना आहे की, जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा त्यावेळी काही निकष तयार करायचे असतात. कारण अनेक पक्ष तेव्हा सोबत असतात. त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“मला विश्वास आहे, भविष्यात मंत्रिमंडळात विस्तार होईल तेव्हा निश्चितपणे त्यांचा विचार होईल. आताही समावेशाचा प्रयत्न केला गेला. किंबहुना त्यांना आमच्याकडून ऑफर देण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की, तुम्ही आम्हाला पुढच्यावेळेस दिलं तेव्हा चालेल पण आम्हाला मंत्रिपद द्या”, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो’

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती. त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो. पण त्यांचीदेखील अडचण होती की, कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावार आणता येत नव्हता. सरकारचा प्रश्न होता की, युतीत वेगवेगळ्या पक्षांसाठी साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो. त्यामुळे राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, तुम्ही विस्ताराच्यावेळेला आमचा विचार करा. विस्ताराच्यावेळेला अनेकांचा विचार होईल”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद

“काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये, एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. विशेषत: आमचे नेते नितीन गडकरी पुन्हा एकदा सरकारमध्ये येत आहेत. त्याचसोबत रामदास आठवले हे देखील पुन्हा सत्तेत येत आहे. रक्षाताई खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासारखे अतिशय तरुण खासदार हे देखील मंत्रिमंडळात सामील होत आहेत याचासुद्धा आम्हाला आनंद होत आहे. प्रतापराव जाधवयांच्यासारखे अनुभवी नेते आणि ज्येष्ठ खासदार ते सुद्धा मंत्रिमंडळात येत आहेत. त्यांच्याबद्दलही मी आनंद व्यक्त करतो. मी सर्वांचं अभिनंदन करतो”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us