नेहमी संशय, सोनं अणि…कुस्तीपटू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, नव्या माहितीमुळे महाराष्ट्रभर संताप!
अश्विनी नोकरीनिमित्त सतत बाहेर जात असल्याने त्यांच्या चारित्र्यावरही संशय घेतला जात होता. तू नोकरी सोडून दे. तू एवढं घराबाहेर पडू नको, असा तगादा अश्विनी यांना लावला जात होता.

Dharashi Ashwini Paul Death Case : धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरुजावर धक्कादायक घटना घडली आहे. येथे राष्ट्रीय लेव्हलची कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी एक मुलगा आणि दोन जुळ्या मुलींना सोबत घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा धक्कादायक प्रकार समोर येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तर हादरवून टाकणाऱ्या बाबींचा उल्लेख आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार एफआयआरमध्ये पौळ यांच्या आत्महत्येचं संभाव्य कारण सांगण्यात आलंय.
एफआयआरमध्ये नेमकं काय आहे?
अश्विनी पौळ आत्महत्या प्रकरणात त्यांचे वडील तानाजी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर या फिर्यादीनुसार एफआयआर दाखल करण्यात आलाय. तानाजी यांनी केलेल्या दाव्यानुसार अश्विनी यांचा मनोहर अंकुश पौळ यांच्यासोबत विवाह झाला होता. या दाम्पत्याला अगोदर अजिंक्य नावाचा मुलगा झाला. नंतर क्रांती आणि वीरा अशा दोन मुली झाल्या. या दोन मुली झाल्यापासून अश्विनी यांचा त्यांच्या सासरी छळ शुरू झाला.
हुंड्यासाठी तगादा, मारहाण
लग्न झाल्यावर तुझ्या घरच्यांनी हुंड्यात काहीही दिले नाही. आता तुला दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. त्यामुळे मनोहरला रिक्षा घेण्यासाठी तुझ्या माहेराहून पैसे घेऊन ये, सोन्याच्या पाटल्या करण्यासाठीही पैसे घेऊन ये असा तगादा अश्विनी यांना लावला जात होता. तसेच अश्विनी यांना सातत्याने मारहाण केली जात होती. शिवीगाळ केली जात होती. अश्विनी यांना मारहाण होऊ नये यासाठी तानाजी मोहिते यांनी अश्विनी यांच्या सासरच्या लोकांना म्हैस घेऊन दिली होती. तरीही अश्विनी यांचा छळ काही थांबला नाही.
श्विनी यांच्यावर संशय घेऊन….
दुसरीकडे अश्विनी नोकरीनिमित्त सतत बाहेर जात असल्याने त्यांच्या चारित्र्यावरही संशय घेतला जात होता. तू नोकरी सोडून दे. तू एवढं घराबाहेर पडू नको, असा तगादा अश्विनी यांना लावला जात होता. अश्विनी यांच्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण केली जात होती, असाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता अश्विनी पौळ आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले असून महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातोय. पोलीस या प्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.