अकोला शहरातून मोठी बातमी, हरीहर पेठेत दोन गट पुन्हा समारोसमोर भिडले, दोन दिवसांनी पुन्हा राडा

अकोला शहरातील हरीहर पेठेत आज पुन्हा एकदा संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात अकोला पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक दाखल झालं आहे.

अकोला शहरातून मोठी बातमी, हरीहर पेठेत दोन गट पुन्हा समारोसमोर भिडले, दोन दिवसांनी पुन्हा राडा
अकोला शहरातून मोठी बातमी, हरीहर पेठेत दोन गट पुन्हा समारोसमोर भिडले
Chetan Patil | Updated on: Oct 09, 2024 | 5:43 PM

अकोला शहरातील हरीहर पेठेत पुन्हा एकदा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. हरीहर पेठेत दोन गटात पुन्हा वाद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे हरीहर पेठेत पुन्हा एकदा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर तो वाद शमत नाही तेवढ्यात दोन दिवसांनी पुन्हा राडा झाला आहे. संबंधित घटनेनंतर आता हरीहर पेठ परिसराला छावणीचं स्वरुप मिळालं आहे. घटनेच्या ठिकाणी अकोला पोलीस दाखल आहेत. तसेच घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकही दाखल झालं आहे.

पोलिसांनी आजच्या घटनेनंतर 17 जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास राडा झाला होता. आतादेखील याच वेळेत दोन गटात मोठा राडा झाला. त्यामुळे पोलिसांच्या मोठ्या फौजफाटाला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना ही एका शुल्लक कारणावरुन झाली होती. दरम्यान, आज जी घटना घडली त्या वादामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात आता तणावपूर्ण शांतता आहे.

दोन दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

अकोल्यात दोन दिवसांपूर्वीदेखील वाद झाला होता. या परिसरात रिक्षा आणि बाईकची धडक झाली होती. त्यामुळे वाद झाला होता. या शुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या वादाचं रुपांतर थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. विशेष म्हणजे यावेळी दोन गट आमनेसामने आले होते. यावेळी भर रस्त्यावर दोन्ही बाजून जोरदार दगडफेक करण्यात आली होती. तसेच रस्त्यावरील रिक्षा आणि तीन दुचाकी जाळण्यात आला होता. यावेळी संबंधित घटना कव्हर करण्यासाठी आलेल्या एका पत्रकाराचीदेखील दुचाकी जाळण्यात आली होती.

संबंधित परिसरात दोन्ही गटाचे नागरीक राहत असल्याने या परिसरात छोट्या-मोठ्या कारणावरुन वाद होत असतात. पण दोन दिवसांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. यानंतर आज पुन्हा वाद झाला. संबंधित घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांकडून आता काळजी घेतली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us