Eknath Shinde : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार; बड्या नेत्याचं वक्तव्य

राज्याच्या राजकारणात पुन्हा फोडाफोडी होणार असल्याचे संकेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. नरेश म्हस्के यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार; बड्या नेत्याचं वक्तव्य
eknath shinde news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 12:34 PM

राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने भुसावळमधील शरद पवार गटाचे 11 नगरसेवक फोडले. तर मुंबईत महापौरपदासाठी देखील एकनाथ शिंदे यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. आता ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा केली जात आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना येत्या दिवसांत ठाकरे गटात कोणीच शिल्लक राहणार नाही. येत्या काही दिवसांत सर्व कळेल, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे नेते, खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. खासदार म्हस्के यांच्या दाव्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील दहीहंडींना भेटी देत आहेत. संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला हजर राहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला. राजकीय हंडीविषयी म्हस्के म्हणाले, ‘राजकीय हंडी ही एकनाथ शिंदेंनी फार पूर्वी फोडली. त्यांनी दाखवून दिलं की, ठाण्याचा एकनाथ शिंदे हंडी फोडू शकतो. आता आगामी फोडाफोडी कळेल. काही दिवसांतच कळेल. कोणीच शिल्लक राहणार नाही. ठराविक दोन-व्यक्ती सोडल्यावर, कोणीच शिल्लक राहणार नाही’.

नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांनी तुरुंगात विष प्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यावरून म्हस्के म्हणाले, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत प्रसिद्धीत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत असतात. ते उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर चढून हंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसिद्धी माध्यमात राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. मानसिक रुग्णाची शेवटची स्टेज आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये करत आहे’.

‘राहुल गांधींच्या जवळ असल्याचे भासवत आहेत. राहुल गांधी राज्यसभेची संधी देतील. कारण इकडे काही नाही. सातत्याने राहुल गांधींचा जप करतात. कारण त्यांना संधी हवी असेल, तर त्यांना राहुल गांधी हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील दहीहंडीवर म्हस्के म्हणाले, ‘रामनगरच्या पथकाने 9 थर लावले आहेत. ठाणेकरांनी हा विक्रम केला आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीचं आयोजन हे रविंद्र पाठक यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आहे. दहीहंडीची पंढरी ठाण्याला म्हटलं जातं. संपूर्ण ठाण्याचं वातावरण दहीहंडीमय झालं आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us