CM-DCM: एकनाथ शिंदे-फडणवीस हा फेविकॉलचा जोड, मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा, स्नेह भोजनात आमदारांना काय संदेश?

| Updated on: Jul 16, 2022 | 11:54 PM

द्रौपदी मुर्मु यांना राज्यात २०० मते मिळतील, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास शिंदे यांनी यानिमित्ताने सगळ्यांना दिला. कुणाला मंत्री केले नाही म्हणून मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याला बळी पडू नका, असे आवाहन एकनाथ शिंदेंनीही यानिमित्ताने केले

CM-DCM: एकनाथ शिंदे-फडणवीस हा फेविकॉलचा जोड, मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा, स्नेह भोजनात आमदारांना काय संदेश?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मिशन 200
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हा फेव्हिलकॉलचा मजबूत जोड आहे, तुटेगा नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर सरकार भक्कम आहे, दोघांनी एकत्र मिळून काम करायचे आहे हेही त्यांनी सांगितले. आपल्यात मतभेद करण्याचे अनेक जण प्रयत्न करतील, पण त्याला बळी पडू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी सगळ्या आमदारांना दिला. राष्ट्रपती निवडणुकीच्या (President Election)निमित्ताने शिंदे आणि भाजपाच्या आमदारांच्या स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला, त्यात फडणवीस यांनी हा सल्ला सगळ्या आमदारांना दिला आहे. आपल्याला कमी कालावधीत अधिक चांगंल काम करायचं आहे, ते राज्याला दाखवून द्याचं आहे, असंही त्यांनी यावेळी सगळ्या आमदारांना सांगितलं. गेल्या १६ दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपदावरुन सुरु असलेली रस्सीखेच, दररोज सुरु असलेली शक्तिप्रदर्शनं या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना स्थिर राहण्याचा सल्ला दिल्याचे मानण्यात येत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून हे सरकार बेकायदेशीर आहे, अशी टीका सातत्याने शिवसेना खासदार संजय राऊत करीत आहेत. या सगळ्यात आज त्यांनी राज्यपालांना लक्ष्य करत, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीच ट्विट करुन केली आहे. या सगळ्यात शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांचे मनोबल स्थिर राहावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात हा संदेश दिल्याची माहिती आहे.

द्रौपदी मुर्मु यांना २०० मते पडतील-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाचं एकही मत बाद होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. द्रौपदी मुर्मु मोठ्या मताधिक्याने निवडणून यायला हव्यात, त्यात जास्तीत जास्त आपल्या राज्याची मते त्यांना पडायला हवीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितले. द्रौपदी मुर्मु यांना राज्यात २०० मते मिळतील, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास शिंदे यांनी यानिमित्ताने सगळ्यांना दिला. कुणाला मंत्री केले नाही म्हणून मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याला बळी पडू नका, असे आवाहन एकनाथ शिंदेंनीही यानिमित्ताने केले. आपआपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्या, अशा सूचनाही यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी सगळ्या आमदारांना दिल्या आहेत. सगळ्यांना पुन्हा निवडणून आणायचे आहे आणि त्यातही आपल्यासोबत अपक्ष आहेत त्यांनाही आपल्याला निवडून आणायचे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात १२ सदस्य असतील तरच ते निर्णय घेऊ शकतात, या हरी नरके यांच्या ट्विटचा दाखला देत राऊत यांनीही मागणी केली आहे. राज्यपाल याकडे दुर्लक्ष करीत आहेत का, असा आक्षेपही त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात शपथविधी, विश्वास दर्शक ठराव हे सगळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या आधी झालेला प्रकार बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता पुढचे काही दिवस राज्यात हा नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.