मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच नेत्यांची धावाधाव; शिंदे गटाचे 2 मंत्री अंतरवालीत, काय चर्चा होणार?
मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. शिंदे गटाचे 2 मंत्री आज अंतरवालीत पोहोचणार आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा नारा दिला आहे. या आंदोलनाआधी मनोज जरांगे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली जात आहे. जरांगे यांच्याकडून आता थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच टीकेचे बाण सोडले जात आहे. ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरवल्यानंतर जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे यांचा समजून काढण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई देखील मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई हे आज सोमवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील. या नेत्यांची आज सोमवारी दुपारी दोन वाजता अंतरवाली सराटी येथे बैठक होईल. एकीकडे मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने शिंदे गटाचे दोन मंत्री हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचणार आहेत. अलीकडे मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवरही टीका केली. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यानंतर शिंदे शिवसेनेचे दोन नेते आज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी काल अचानक मनोज जरांगे यांची भेट घेतली. तुम्ही योद्धा आहात. चुका झाल्या असतील. गैरसमज झाला असेल, चर्चा करून दूर करता येईल. परंतु त्यासाठी आधी चर्चा करावी लागेल, अशा शब्दात सत्तार यांनी जरांगे यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जरांगे म्हणाले, ‘आम्ही संजय शिरसाट, शिंदेसाहेबांवर जिवापाड प्रेम केलं. परंतु मैत्रीपेक्षा समाज महत्त्वाचा आहे. मैत्रीसाठी समाजाचे नुकसान होऊ देणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सत्तार यांना सांगितले. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. सत्तार यांच्यानंतर आता मंत्री उदय सामंत जरांगेंची भेट घेणार आहेत.
लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगे यांच्यावर टीका
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, ‘ओबीसी समाजाचं आरक्षण संपलेले आहे. सरकारने हे आरक्षण समुद्राच्या खोल नेऊन बुडवलं आहे. 1 सप्टेंबरला पूर्ण ताकदीनिशी आम्ही मुंबई मोर्चा घेऊन धडकणार आहे. मनोज जरांगे हा येडपट माणूस आहे’.
‘मंत्री उदय सामंत हे सरकारच्या वतीने पहिल्यांदाच ओबीसी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी इच्छा व्यक्त केली. सरकारचं हे ओबीसी समाजासाठी संवादाची पहिल्यांदाच भूमिका म्हणावी लागेल. आम्ही मुंबईत मोर्चाची परवानगी पहिल्यांदा मागितली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकारचा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.