Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?

| Updated on: Dec 31, 2021 | 10:51 AM

महाराष्ट्रातील मुंबई आणि औरंगाबाद महापालिका वगळता इतर 18 महापालिकांनी पुनर्रचना आराखडा सादर करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने जारी केली आहे. ओबीसी आरक्षण प्रश्न व कोरोनासंकटामुळे निवडणुका होतील की नाही, असा प्रश्न विचारला जात होता, यावरील चित्र नव्या आदेशामुळे काहीसे स्पष्ट झाले आहे.

Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?
राज्य निवडणूक आयोग
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातील मुंबई आणि औरंगाबाद महापालिका वगळता इतर 18 महापालिकांची निवडणूक (Municipal corporation Election) आगामी वर्षातील मार्च महिन्यात होतील. त्यासाठीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने ( State Election commission) सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाने संबंधित महापालिकांना 7 जानेवारीपर्यंत सुधारित आराखड्यानुसार, आरक्षण निश्चिती, प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच इतर आकडेवारीची माहिती पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यात औरंगाबाद आणि मुंबई महापालिकांच्या निवडणुकांबाबत निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या दोन महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. उर्वरीत महापालिकांच्या निवडणुकीसाठी 1 फेब्रुवारी रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

काय आहेत निवडणूक आयोगाचे आदेश?

राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काढलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही, तोपर्यंत आगामी सार्वत्रिक पोटनिवडणुकांमध्ये मागास प्रवर्गाच्या जागा खुल्या प्रवर्गात अधिसूचित करून निवडणूका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे मागास प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाही. ही बाब लक्षात घेता, सर्व प्रभागांना सर्वसाधारण महिलांचे आरक्षण उपलब्ध होण्यासाठी सोडत काढण्याच्या प्रक्रियेत बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकीसह संपूर्ण प्रस्ताव 6 जानेवारी रोजी निवडणूक आयुक्तांना सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

औरंगाबाद आणि मुंबई निवडणूक लांबणीवर?

औरंगाबाद महापालिकेची मुदत 2020 मध्येच एप्रिल महिन्यात संपली आहे. मात्र पूर्वीच्या वॉर्डरचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने त्यास स्थगिती दिल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आराखड्याच्या प्रक्रियेत औरंगाबादचा समावेश करण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मुंबईत गेल्या काही दिवसात अचानकपणे वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, मुंबई पालिकेच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जारी केलेल्या आदेशात या दोन्ही महापालिकांची नावे नाहीत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

इतर कोणत्या महापालिकांच्या निवडणूका?

राज्यातील कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर, नवी मुंबई महापालिकांना 4 जानेवारी पर्यंत पुनर्रचनेचा आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उल्हासनगर, सोलापूर, अमरावती, अकोला या महापालिकांना 5 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर नाशिक, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांना 6 जानेवारी तर ठाणे महापालिकेला 7 जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Gadchiroli tiger | आधी विजेचा शॉक लावून वाघाला मारले, मग नाल्यात पुरला मृतदेह; नख आणि मुंडके गायब!

संतोष परब हल्लाप्रकरणातील संशयित मनिष दळवी विजयी; सिंधुदुर्ग बँकेच्या निकालास सुरुवात